Tuesday, 24 September 2019

आठवणीतली पंचमी

सकाळी सकाळी थोरल्या चुलतीचा फोन आला; भावाच्या हाती पाठवलेली शिदोरी, साडी-बांगड्या व्यवस्थित पोहोचल्या का,  विचारत होती. सगळे काय करतायत विचारलं तर म्हणाली ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा फस्त करतायत....
  श्रावण सुरू झाला की पहिला सण असायचा नागपंचमीचा. बायकांच्या खास जिव्हाळ्याचा सण. आमच्याकडे सासुरवाशिणी माहेरी यायच्या. साडी खरेदी, जिथं ते शक्य नाही तिथं किमान चांगलं ब्लाउजपीस घेतलं जायचं.
मेंदीचे कोन नव्हते, पण ठिपक्यांची मेंदी लावायच्या सगळ्या, काहीजणी पूर्ण तळवा रंगवायच्या.
बांगड्या भरणे मात्र सगळ्यांसाठी अनिवार्य सोहळा होता.
पंचमीच्या आदल्या दिवशी कासार यायचा आणि आमच्या खालच्या ओसरीत बसायचा. गावातल्या बायका तिथे गोळा व्हायच्या. काही तालेवार घरं होती, तिकडे बोलवायला जावं लागायचं. त्यांच्याकडे निरोप देत देत आम्ही बाकी लोकांसाठीही
"गौडुर मनिगे बळगार बंदेना, येल्लारू बर्ररी..." ( पाटलांच्या घरी कासार आलाय, सगळे या ) अशी हाळी देत रस्त्याने जायचो.
कासार कासारीण जोडीने यायचे; पण बांगड्या भरण्याचे काम चच्चाचे, बीबी फक्त बांगड्या काढून द्यायची आणि आलेल्या पोरी बाळींशी गप्पा मारायची. सगळे पैसे द्यायचे असे नाही. आमच्याकडून धान्य दिले जायचे, काही जणांच्या घरी घाणे होते, तिकडून तेल दिले जायचे. नंतर नंतर मात्र सगळा व्यवहार पैशात व्हायला लागला. तीन चार रंगाच्या चमकीचे ठसे असणाऱ्या काचेच्या बांगड्या असायच्या.. जास्तीत जास्त लहान साईझ चढवा ही मागणी असायची, कारण बांगड्या सैल असल्या की घरकाम करताना वाढायच्या. लहान मुलींसाठी प्लास्टिकच्या बांगड्या असायच्या. काचेची बांगडी येण्याइतका हात मोठा झाला की बीबी ओरडायची, "इसका इस साल देखो पाटलीन, छोकरी बडी हुई देखो".  छोकरी कुणाचीही असली तरी जबाबदारी पाटलीनीकडेच दिली जायची. मग माझी थोरली चुलती लगेच चौकशी सुरू करायची; सगळ्यांच्या माहितीतल्या स्थळांची उजळणी व्हायची. छोकरी उगीच गोरीमोरी व्हायची .
पंचमीच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असायचा, पण पोळ्या करण्याऐवजी पुरणाचे कानवले/ दिंडे केले जायचे.
आमच्याकडे वारुळाला जायची पद्धत नव्हती.
आजोबा भट्टीला ज्वारी न्यायचे आणि त्याच्या लाह्या करून आणायचे.
घरातल्या देव्हाऱ्यात शंकराची पिंड होती आणि त्याच्या डोक्यावर मोठा पितळी नागोबा.. पंचमीच्या दिवशी यांना फार महत्व यायचं. पूजा करून त्यांच्यावर दूध लाह्या वाहिल्या जायच्या. मग समस्त बहिणींचा उपवास सुटायचा (पंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठीचा उपवास असायचा; भाऊ असणाऱ्या सगळ्या हा उपवास करायच्या).
मोठे वाडे असणाऱ्यांच्या अंगणात झोके बांधले जायचे, आणि दुपारी सगळ्या मुली, बायका नवीन साड्या नेसून तिथे गोळा व्हायच्या.
लहान मुलींना परकर पोलके असायचे, काही शहरात राहणाऱ्यांचे फ्रॉक असायचे.
 सगळ्या फेर धरून भुलई खेळायच्या, त्यात काही मराठी तर काही कन्नड गाणी असायची. माहेरची आठवण, आई वडिलांचं आणि भाऊ वहिनीचं कौतुक, सासरी असलेले कष्टाचे जीवन, अशी साधारण गाण्यांची गोष्ट असायची. माझी आजी एक गाणं म्हणायची ; मूळ गाणं आठवत नाही पण साटंलोटं झालेली(एका घरातल्या बहीण भावाचं लग्न दुसऱ्या घरातल्या भाऊ बहिणीशी करतात) एक माहेरी आलेली मुलगी आपल्या भावजय कम नणंदेला विनवते की तिने हिच्या आईवडिलांची नीट काळजी घ्यावी, बदल्यात ही आपल्या सासूचे रोज पाय चेपेल.
झोक्यासाठी गर्दी व्हायची, किरकोळ भांडाभांडी सुद्धा, पण मग एखादी ताई पुढे यायची आणि शिस्तीत सगळ्यांचे नंबर लावून द्यायची.
अंधार पडला की मग सगळ्या पांगायच्या.

पंचमीच्या दुसऱ्या दिवशीची आम्हा मुलांना फार उत्सुकता असायची. ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा हा नाश्ता त्यादिवशी सकाळी मिळायचा. पॉपकॉर्न हा पदार्थ माहीत नसलेला तो काळ होता; त्या चिवड्याचं प्रचंड अप्रूप होतं. आणि तेव्हा असे पदार्थ अगदी त्या सणापुरतेच मर्यादित असायचे. मुलांना आवडतात तर ठेऊ घरात वर्षभर, ही कन्सेप्टच नव्हती. त्या लिमिटेड एडिशन देशी पोपकॉर्नवर अक्षरशः तुटून पडायचो आम्ही सगळे.
मग आळसावत चुलीवरचा निरश्या दुधात केलेला चहा पीत कुणाची मेंदी फिक्कट झाली, कुणाचे नखपॉलिश निघाले ते बघत ओसरीवर बसायचो. झोपाळा बाजूला रिकामा असायचा, कालच्यासारखे नंबर लागलेले नसायचे; पण आज कुणाला झोके घ्याचा फारसा उत्साह नसायचा ...



No comments:

Post a Comment