कॉलेजमध्ये असताना एकदा मैत्रिणीसोबत एक वाद बरेच दिवस चालला होता(म्हणजे सध्या फेसबुकवर असतो तसा नाही, मुद्दे धरून चर्चा होत होती); नंतर आम्ही अधून मधून भेटतो तेव्हाही हा विषय निघतोच...
विषय असा होता की स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहायचं आणि त्याप्रमाणेच वागायचं; की नाती सांभाळण्यासाठी, जवळच्यांची मनं राखण्यासाठी स्वतःला थोडी मुरड घालायची? यातला कुठला दृष्टिकोन योग्य?
मैत्रीण म्हणायची स्वतःशी प्रामाणिक राहावं, उगीच मनाविरुद्ध वागणं हा स्वतःशी खोटेपणा होईल, आणि ती आपली माणसं असतील तर त्यांनी आपल्याला समजून घेऊन आपण जसे आहोत तसे आपल्याला स्वीकारायला हवे.
मी म्हणायचे नुसतं विचारांच्या सोबतीने जगता येत नाही; एखाद्याचं मन/मान राखण्यासाठी थोडं ऍडजस्ट करायला काय हरकत आहे... आणि ती आपली माणसं असतील तर आधी आपण त्यांना समजून घ्यायला हवे, त्यांच्या वेगळ्या मतांसकट आपणही त्यांना स्वीकारायला हवे.
गेल्या वीस वर्षांत आम्ही दोघी आपापल्या मार्गाने चालत राहिलो, जो स्टँड घेतला होता त्याची आपापल्या आयुष्यात पुरेपूर किंमतही मोजली, दोन्ही बाजूचे फायदे तोटेही कळले. या दोन्ही पद्धतीची टोकाची उदाहरणेही बघितली, ज्यांची परिणिती फार आनंददायी नव्हती.
आता मात्र वाटतं की मैत्रिणीचा मुद्दा बरोबर होता, पण पद्धत चुकत होती आणि माझी पद्धत बरोबर असली तरी मुद्दा चूक होता.
सहजीवन हा एक भाग असतो, आणि स्वभाव हा एक; सहजीवनासाठी स्वभाव बद्दलण्याला मर्यादा असतात, आणि त्या बदलांचे ओझे कुरूप असते. त्याचवेळी स्वभावानुसार जगण्यालाही मर्यादा असतात आणि एकटेपणही सुखावह नसते.
स्वतःशी प्रामाणिक राहताना त्याचा आक्रमक एल्गार पुकारणं आवश्यक असते का? आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारे आपल्याहून स्टबर्न असतात, अशावेळी बदल व्हायला फार वेळ लागतो. बायकांच्या बाबतीत तर दुहेरी अडचण असते कारण लग्नामुळे तिला अजून वेगळ्या वातावरणात स्वतःला रुजवावं लागतं. पण रुजता रुजता आपले मूळही त्यात मिसळावे लागते; तेही तुटेपर्यंत न ताणता. समोरच्याने आपल्याला समजून घ्यावे अशी अपेक्षा करणे पुरेसे नाही; त्यासाठी सक्रिय आणि चिवटपणे, न चिडता प्रयत्न करावे लागतात; प्रसंगी दोन पाऊलं मागेही जावे लागते.
दुसऱ्याचं मन राखण्यासाठी स्वतःला बदलणं हे सुरुवातीला कौतुकास्पद वाटतं, पण नंतर घुसमट व्हायला लागते. आपल्याला मनाविरुद्ध वागावं लागत आहे याची घुसमट नैराश्यात बदलते आणि बऱ्याचदा स्वभावातही कटुता वाढते, आणि ज्यांच्यासाठी आपण बदललो त्यांच्याच वाट्याला ती येते. त्यामुळे महान होण्याच्या ट्रॅपमध्ये न अडकता आपण खरे काय आणि कसे आहोत याचे स्मरण ठेवावे लागते, आणि आपल्या ऍडजस्ट करण्याला मर्यादा आहेत याची जाणीव बाकीच्यांना करून द्यावी लागते.
अडमुठेपणा न करता काही बाबतीत ठाम राहणंही गरजेचं असतं, आणि त्याचसोबत स्वतःला तपासत राहणंही... काही बदल योग्य असतील, चांगले असतील तर ते स्वीकारण्याची आपलीही तयारी हवी.
त्याचवेळी स्वतःच्या विचाराची, आचरणाची जबाबदारी घ्यायला हवी.
सगळ्यात महत्वाचे, प्रत्येक गोष्टीचे सरसकट एकच उत्तर नसते. वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, फक्त आपलाच बरोबर असे नसते;
हे स्वीकारण्याची तयारी हवी.
प्रत्येकाने आपण म्हणू त्या मार्गानेच चालावे हा अट्टाहास नको, हे आपण स्वतःला आणि भोवतालच्यांनाही सांगत, समजावत राहायला हवे...
स्वत्वही राखायचे आणि नातीही; ही तारेवरची कसरत आहे हे मात्र खरं.
विषय असा होता की स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहायचं आणि त्याप्रमाणेच वागायचं; की नाती सांभाळण्यासाठी, जवळच्यांची मनं राखण्यासाठी स्वतःला थोडी मुरड घालायची? यातला कुठला दृष्टिकोन योग्य?
मैत्रीण म्हणायची स्वतःशी प्रामाणिक राहावं, उगीच मनाविरुद्ध वागणं हा स्वतःशी खोटेपणा होईल, आणि ती आपली माणसं असतील तर त्यांनी आपल्याला समजून घेऊन आपण जसे आहोत तसे आपल्याला स्वीकारायला हवे.
मी म्हणायचे नुसतं विचारांच्या सोबतीने जगता येत नाही; एखाद्याचं मन/मान राखण्यासाठी थोडं ऍडजस्ट करायला काय हरकत आहे... आणि ती आपली माणसं असतील तर आधी आपण त्यांना समजून घ्यायला हवे, त्यांच्या वेगळ्या मतांसकट आपणही त्यांना स्वीकारायला हवे.
गेल्या वीस वर्षांत आम्ही दोघी आपापल्या मार्गाने चालत राहिलो, जो स्टँड घेतला होता त्याची आपापल्या आयुष्यात पुरेपूर किंमतही मोजली, दोन्ही बाजूचे फायदे तोटेही कळले. या दोन्ही पद्धतीची टोकाची उदाहरणेही बघितली, ज्यांची परिणिती फार आनंददायी नव्हती.
आता मात्र वाटतं की मैत्रिणीचा मुद्दा बरोबर होता, पण पद्धत चुकत होती आणि माझी पद्धत बरोबर असली तरी मुद्दा चूक होता.
सहजीवन हा एक भाग असतो, आणि स्वभाव हा एक; सहजीवनासाठी स्वभाव बद्दलण्याला मर्यादा असतात, आणि त्या बदलांचे ओझे कुरूप असते. त्याचवेळी स्वभावानुसार जगण्यालाही मर्यादा असतात आणि एकटेपणही सुखावह नसते.
स्वतःशी प्रामाणिक राहताना त्याचा आक्रमक एल्गार पुकारणं आवश्यक असते का? आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारे आपल्याहून स्टबर्न असतात, अशावेळी बदल व्हायला फार वेळ लागतो. बायकांच्या बाबतीत तर दुहेरी अडचण असते कारण लग्नामुळे तिला अजून वेगळ्या वातावरणात स्वतःला रुजवावं लागतं. पण रुजता रुजता आपले मूळही त्यात मिसळावे लागते; तेही तुटेपर्यंत न ताणता. समोरच्याने आपल्याला समजून घ्यावे अशी अपेक्षा करणे पुरेसे नाही; त्यासाठी सक्रिय आणि चिवटपणे, न चिडता प्रयत्न करावे लागतात; प्रसंगी दोन पाऊलं मागेही जावे लागते.
दुसऱ्याचं मन राखण्यासाठी स्वतःला बदलणं हे सुरुवातीला कौतुकास्पद वाटतं, पण नंतर घुसमट व्हायला लागते. आपल्याला मनाविरुद्ध वागावं लागत आहे याची घुसमट नैराश्यात बदलते आणि बऱ्याचदा स्वभावातही कटुता वाढते, आणि ज्यांच्यासाठी आपण बदललो त्यांच्याच वाट्याला ती येते. त्यामुळे महान होण्याच्या ट्रॅपमध्ये न अडकता आपण खरे काय आणि कसे आहोत याचे स्मरण ठेवावे लागते, आणि आपल्या ऍडजस्ट करण्याला मर्यादा आहेत याची जाणीव बाकीच्यांना करून द्यावी लागते.
अडमुठेपणा न करता काही बाबतीत ठाम राहणंही गरजेचं असतं, आणि त्याचसोबत स्वतःला तपासत राहणंही... काही बदल योग्य असतील, चांगले असतील तर ते स्वीकारण्याची आपलीही तयारी हवी.
त्याचवेळी स्वतःच्या विचाराची, आचरणाची जबाबदारी घ्यायला हवी.
सगळ्यात महत्वाचे, प्रत्येक गोष्टीचे सरसकट एकच उत्तर नसते. वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, फक्त आपलाच बरोबर असे नसते;
हे स्वीकारण्याची तयारी हवी.
प्रत्येकाने आपण म्हणू त्या मार्गानेच चालावे हा अट्टाहास नको, हे आपण स्वतःला आणि भोवतालच्यांनाही सांगत, समजावत राहायला हवे...
स्वत्वही राखायचे आणि नातीही; ही तारेवरची कसरत आहे हे मात्र खरं.
No comments:
Post a Comment