मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे पॉक्सो कायद्यानुसार पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी गुन्ह्याची माहिती मिळाल्याच्या चोवीस तासांच्या आत करण्याचे बंधन पोलिसांवर असते.
डॉक्टरांनी तपासणीविषयी सविस्तर माहिती देऊन बालक आणि पालकांची तपासणीसाठी संमती घ्यायची असते. मुलाला कमीत कमी त्रास होईल, प्रायव्हसी जपली जाईल, याची व्यवस्थित काळजी घेऊन तपासणी केली जाते. मुलगी असेल तर महिला डॉक्टर तपासणी करते. बालकाला त्याला कळेल अशा भाषेत तब्येतीच्या तक्रारी विचारल्या जातात. मग शरीरावर कुठे जखमा असतील तर त्यांची सविस्तर नोंद केली जाते. लघवीची जागा काळजीपूर्वक तपासली जाते; इन्फेक्शनची लक्षणे, फॉरेन बॉडी नाही ना, याची खातरजमा करतात. तसेच फॉरेन्सिक तपासणीसाठी सॅम्पल घेतले जातात. कपड्यांवर डाग असल्यास तेही फॉरेन्सिक लॅबला पाठवले जातात. शी ची जागा तपासली जाते. तसेच तोंडही जखमांसाठी तपासले जाते. ही सगळी तपासणी हळुवारपणे, मुलाला जास्त वेदना होणार नाहीत याची काळजी घेत केली जाते. मूल घाबरल्यास, नकार देत असल्यास थोडं थांबून, समजूत घालून थोड्या वेळाने तपासणी पूर्ण करतात. मुलासोबत धीर देण्यासाठी पालक थांबू शकतात.
तपासणी झाल्यावर इजेनुसार उपचार केले जातात. इन्फेक्शनची शक्यता दिसल्यास त्यानुसार औषधं दिली जातात. तसेच मुलगी जननक्षम वयाची असेल तर गर्भ राहण्याची शक्यता लक्षात घेऊन इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात. एखादी जखम मोठी असल्यास टाके घातले जातात.
सिंगल इंसिडन्स, म्हणजे एकदाच गुन्हा घडला असेल आणि लगेच मूल तपासणीसाठी आणलं गेलं असेल तर निदान तुलनेने सोपे असते आणि तपासणीत, सॅम्पलमधून पुरावेही सापडतात.
पण गुन्हा जुना असेल, वारंवार घडत आलेला असेल तर गुंतागुंत वाढते. ताज्या जखमांएवजी जुने व्रण दिसू शकतात. कधी कधी इन्फेक्शनची लक्षणे असतात, लघवीला जळजळ होते अशी तक्रार असते, तर कधी काहीच सब्स्टँशियल सापडत नाही. मुलगी असेल तर हायमेन टियर वरून कल्पना येऊ शकते. अशा केसेसमध्ये फार काळजीपूर्वक तपासणी करावी लागते.
मूल मानसिक धक्क्यात असेल तर मानसोपचार तज्ज्ञाची सोय केली जाते.
तपासणीचा अहवाल काटेकोरपणे भरून तपास अधिकाऱ्यांना दिला जातो जे तो पुढे मॅजिस्ट्रेटकडे सादर करतात.
दुर्दैवाने मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार जास्त करून रिपीटेड ऑफेन्स प्रकारातले असतात आणि ओळखीच्या, संपर्कातल्या व्यक्तीकडून केले जातात. अशावेळी पालकांना हे कळल्यानंतर कितीही वेदनादायी परिस्थिती असली तरी त्यांनी मुलांसमोर भीती प्रकट करू नये. मूल आधीच दहशतीखाली वावरत असते; बहुतांश वेळा गुन्हेगार, "तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन", अशी धमकी देतात. अशावेळी आई वडील घाबरलेले दिसले की मुलं काहीच बोलत नाहीत, कोषात जातात. मुलांना आधी सगळे सुरक्षित आहेत, आई वडील स्ट्रॉंग आहेत आणि त्यांना कुणी इजा पोहोचवू शकत नाही असा विश्वास वाटावा लागतो, मग ते ओपन अप होतात.
दुसरं म्हणजे कधीच भरून न येणारं नुकसान झालं, असा दृष्टिकोन ठेवू नये, आणि मुलांसमोर तर कधीच तसं व्यक्त होऊ नये. मुलं संभ्रमित असतात, दुखावलेली, घाबरलेली असतात, पण त्याचवेळी आपला दृष्टिकोन सकारात्मक, बळ देणारा असेल तर ती लवकर सावरतात सुद्धा. आपल्या बाबतीत काहीतरी भयंकर किळसवाणा प्रकार घडला आहे, आपलं शरीर कायमचं pollute झालं असं त्यांना वाटलं तर मानसिक समस्या वाढतात.
लहान मुलांच्या बाबतीत कुठलाही लैंगिक व्यवहार घडला की गुन्हा दाखल होतोच; इथे पालक आम्हाला तक्रार करायची नाही अशी भूमिका घेऊ शकत नाहीत. आपल्या कुटुंबात, किंवा नातेवाईक, मित्रपरिवारात कुणाच्याही बाबतीत असा प्रसंग उद्भवल्यास पॅनिक मोडमध्ये न जाता शांतपणे आणि चौकसपणे सगळी प्रक्रिया नीट फॉलो केली जातेय याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच मुलांसमोर धीरोदात्त राहणे अतिशय गरजेचे आहे.
एरवीही जर कुठले मूल खेळकरपणा सोडून अचानक अबोल झाले असेल, बाहेर जायला घाबरत असेल, विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट व्यक्तीसोबत जायला काहीतरी कारणं सांगून नकार देत असेल, लघवीला त्रास होत असल्याची वारंवार तक्रार करत असेल, तुम्ही न आणलेली नवीन खेळणी किंवा खाऊ त्याच्याकडे सारखा सापडत असेल, त्याच्या/ तिच्या कपड्यांवर संशयास्पद डाग दिसले असतील, तर सावध होऊन थोडी विचारपूस करणं गरजेचं असतं.
सेक्शुअल अब्युज होत असल्यास योग्य ती कायदेशीर प्रक्रिया फॉलो करणे आवश्यक. यात गुन्हेगाराला कडक शिक्षा करणे हे न्यायसंस्थेचे काम; पण अशा प्रक्रियेत आपण सामील असल्यास बालकाच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. असा प्रसंग शरीर-मनावर खोल आघात करणारा असतो हे अगदी मान्य; पण ही कधीच न भरू शकणारी भळभळणारी जखम आहे असा दृष्टिकोन न ठेवता 'काळ हेच औषध' यावर विश्वास ठेवून, जसं एखाद्या मोठ्या अपघात किंवा आजारातून आपण प्रयत्नपूर्वक बाहेर येतो, तसे या दुर्घटनेतूनही नक्की येऊ शकतो, हा मोठ्यांचा अप्रोच हवा. मुलं सेन्सिटिव्ह असतात, तशीच ती resilient ही असतात. त्यांनी लवकरात लवकर normalcy कडे यावं यासाठी प्रयत्न करणे सगळ्यात महत्वाचे आहे.
पुढच्या भागांमध्ये महिलांशी निगडित गुन्हे डिस्कस करण्याचा प्रयत्न करेन