Tuesday, 15 October 2019

बुद्धिजीवी आणि बहुजन


गांधी कळायला फार वेळ लागतो, आणि डोळे सताड उघडे; तरी पूर्ण कळतीलच असे नाही...
नेमकं कुठल्या पुस्तकात ते आठवत नाहीय, पण गांधींचे एक वाक्य वाचले होते... "सुधारणा(reforms) व्हावी याची ओढ सुरुवातीला सुधारकांना असते, समाजाला नाही; त्यामुळे सुधारकांनी  लोकांकडून अज्ञापालनाची अपेक्षा करू नये, उलट प्रतिकूल प्रतिसादासाठी तयार असावं."
गांधीविचार प्रामाणिकपणे मानणाऱ्यातले सुद्धा किती जण या बाबतीत संयम ठेवतील?

गांधी हे केवळ आदर्शवादामुळे नव्हे, तर समाजमनाचे आकलन उत्तम असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला वश करू शकले. काही तात्कालिक अभिजनांना त्यांची जीवनशैली हास्यास्पद, त्यांच्या योजना बाळबोध वाटतही असतील; पण गांधींना सामान्य माणसाची भाषा कळत होती, आणि लोक त्यांच्याशी कनेक्ट करू शकत होते. त्यामुळे बहुसंख्य समाज गांधी बाबाच्या मागे उभा राहिला.

बहुसंख्य लोकांच्या प्रज्ञेवर अविश्वास दाखवून, त्यांच्या निर्णयक्षमतेला कमी लेखून, त्यांच्या निवडीची हेटाळणी करून  राजकीय बदल घडवण्याची अपेक्षा व्यर्थ आहे.
अभिजन जेव्हा बहुजनांबद्दल असा तुच्छतावाद दाखवतात, तेव्हा नेहमी विरोधकांचा फायदा होतो. हे अतिहुशार विचारवंत तुम्हाला सतत तुच्छ लेखतात, त्यांना तुमच्याबद्दल कसलीही आत्मीयता नाही; अशी लोक काय तुमचं भलं करणार, हा युक्तिवाद पटायला लागतो. आणि आपल्याला हसणारी लोक ज्या बाजूने आहेत, ती बाजू आपल्यासाठी वाईटच असणार, तेव्हा आपण त्याच्या उलट बाजूला जायचं, इतकं साधं गणित लोकांच्या मनात तयार होतं.

मग याचे परिणाम दिसले तरी  विचारांधतेमुळे, आपले आकलन इतर समान्यजनांपेक्षा खूप जास्त आहे या अहंकारामुळे, आपण कुठे कमी पडलो हे डोळसपणे न बघता परत एकदा लोकांना दोष देणे सुरूच राहते. आणि परत एक असेच वर्तुळ सुरू होते.


2 comments: