Wednesday, 9 October 2019

पियानो की धुन पर

मघाशी एक कथा वाचत होते, त्यात नायक पियानो दुरुस्त करायचा असा उल्लेख आहे.
त्यावरून एकदम आपल्या हिंदी सिनेमांमधला पियानो आणि त्यावर गायलेली  गाणी आठवली.
जुन्या चित्रपटांमध्ये  पियानोवर एक तरी गाणं असायचंच. प्रसंगही बऱ्यापैकी ठरलेले होते.
 श्रीमंत नायिकापित्याचे आलिशान घर, जनम-दिन की दावत, नायिकेच्या प्रेमळ आग्रहाखातर आलेला गरीब घरचा नायक ... क्वचित एखादं व्हेरिएशन सोडलं तर सहसा हाच प्रसंग असायचा.
मग पियानो वाजवत नायक/ नायिका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्यार का इजहार करायचे. बाकी सगळी मंडळी(मुलीचे वडीलसहित) हातातली रंगीत द्रव्य सांभाळत अज्ञानात आनंद साजरा करायची. गरीब घरातल्या नायक हे पियानो वाजवायचे कसब बहुतेक कॉलेजातच शिकत असावा; रादर तो जे फर्स्ट क्लास फर्स्ट यायचा, त्यातला एक फर्स्ट तरी या पियानोवादन प्राविण्याचाच असावा..
दुसरा प्रसंग मात्र शिरेस असायचा, जुदाईचा. यात थोडी व्हरायटी असायची...  गैरसमज/ जालिम दुनिया/ हिरॉईनने मजबुरीत नकार देणं आणि हिरोला ती बेवफा वाटणं... मग त्यानुसार पत्थर के सनम असे दोषारोप, किंवा चलो एक बार फिर से अजनबी बन जाये, असं लायसन्स टू लीव्ह प्रपोजल असायचं.
काही गाण्यात हिरो एखाद्या हॉटेलमध्ये गात असायचा आणि हिरोईन रकीब के साथ यायची, मग हिरो त्वेषाने पियानोच्या कीज बडवत नायिकेच्या भावनांना जोरदार आवाहन करायचा, रकीब परत अज्ञानात आनंद मोडमध्ये गाणं एन्जॉय करायचा.

अजून एक प्रकार असायचा... मुग्ध नायिका अपनी ही लगन में मगन स्थितीत एखादं लडिवाळ स्वगत गात असायची आणि कव्हरेज क्षेत्रात असलेले किंवा आगमन झालेले कधी नायक तर कधी व्हिलन मनात मांडे खायला लागायचे...

काही गाणी मात्र सिनेमाचं थीम सॉंग असायची आणि चित्रपट भर अधून मधून वाजत राहायची. मेरी जंग सिनेमात तर नुसतं गाणच नव्हे, तर महाभारतातल्या रथाचे चित्र असलेल्या पियानोला सुद्धा विशेष महत्व होतं.
पियानोचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा की सगळे शिस्तीत एका जागी बसून, उभे राहून, फार तर एखादी फेरी मारत गाणं पूर्ण करायचे; आतासारखी आचरट स्टेप्स करत नाचायची सक्ती नव्हती...

आताशा बहुतेक इतकी सवड नसते कुणाला; दिलवाले मध्ये अजय देवगणने 'एक ऐसी लडकी थी' म्हटल्यानंतर आणि धडकन मध्ये सुनील शेट्टीने 'तुम दिल की धडकन हो' चा उद्घोष केल्यानंतर फार कुठे पियानो दिसला नाही .

अजून एक हटके गाणं आहे ज्यात पियानो आहे; बहुदा ही एकमेव अंगाई असेल जी आईने न गाता दोन नायकांनी गायली आहे.
'दुनिया दिलवालों की' नावाचा एक डब सिनेमा आला होता, त्यातलं "जा री जा, ऐ हवा, शोर तू न मचा..".. हे एक फार म्हणजे फार गोड गाणं आहे...






No comments:

Post a Comment