Tuesday, 15 October 2019

ओंडक्यांची भेट

काल गुलजार यांच्या वाढदिवसामुळे रात्री  आँधीमधल्या गाण्यांची उजळणी झाली, आणि आज मेमरीत मी शेअर केलेली सुधीर मोघे यांची ही कविता दिसली( कवितेच्या या शैलीला त्यांनी 'स्वगत-संवाद' हे सार्थ नाव दिलंय).
"इस मोड से जाते हैं," आणि
"तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं",  या दोन्हींच्या मधला टप्पा म्हणजे ही कविता आहे !
             ************
एक सांगशील,
आपले रस्ते अवचित कुठे; कसे जुळले?
आपल्याच नादात चालताना
हे देखणे वळण कसे भेटले?

क्षणाभोवती
ही कसली रंगत खुलते आहे?
जगणं व्हावं गाणं
अशी स्वरांची संगत जुळते आहे
पण खरं सांगू?
या वाटांचं हे असं भेटणं बरं नव्हे
जीवघेणं उत्कट असेल
तरीही ते खरं नव्हे

तुझी दिशा पूर्वीच निश्चित
ती बदळणं हिताचं नाही
माझ्यापुरतं बोलायचं
तर मला माझी दिशाच नाही

तुझ्या संगतीत
आनंद आहे. आश्वासन आहे, दिलासा आहे.
माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात
भंगण्याचाच वसा आहे

म्हणून म्हणतो,
अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये
जीव जडवून, चटका लावून,
निदान दूर होणं तरी असू नये

पण अशा वेळी कळून येतं
आपण आपले मालक नसतो
रस्ते आपली दिशा आखतात
आपण फक्त चालत असतो.
- सुधीर मोघे
      *****************
आपापल्या मार्गाने सुखनैव जाणाऱ्यांच्या वाटा अवचित एकमेकांना छेद देतात; आणि सगळे व्यवहारिक शहाणपण बाजूला ठेवत कुठल्या प्रेरणेने एक व्हायला बघतात... 
पण शेवटी प्रवास असतो तो, थांबवता येत नसतो... आणि वाटांना उचलून हवे त्या दिशेला वळवता येत नाही. फार तर काही काळ एकत्र धावतात त्या; तशा आखलेल्या असतील तर...
 तेही चांगलं की वाईट? कारण न भेटणं आणि भेटून हरवणं यातलं काय जास्त त्रासदायक, कोण जाणे...

प्रवासाची आणि वाटा न जुळण्याची अपरिहार्यता मान्य करून मग कुणी फैज
"यूँ न था, मैनें फ़कत चाहा था यूँ हो जाये," म्हणतो;
किंवा एखादा राजेंद्र कृष्ण
"न तुम बेवफा हो, ना हम बेवफा हैं
मगर क्या करें अपनी राहें जुदा है"
असा निवाडा करतो.
" इन रेशमी राहों में, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहूँचती है", म्हणणारा गुलजारही नंतर " तुम गर साथ हो, मंजिलों की कमी तो नहीं" म्हणताना साथ हवी असेल तर  मंजिल बदलावी लागेल हे मान्य करतो ....




श्रीकृष्ण

श्रीकृष्णाशी निगडित कुठलाही उत्सव आला की राधाकृष्ण रूप फार लोकप्रिय आहे हे जाणवते. साधारण आठव्या-नवव्या शतकात राधेचा कृष्णाचारित्रात प्रवेश झाला, आणि मधुराभक्तीने तिला अजरामर केले. पण खरंच ती संकल्पना आपल्याला कळली आहे, की आपापल्या सोयीसाठी आपण तिचे विकृतीकरण करतोय, अशी कधी कधी शंका येते.
अशा वेळी शांतपणे कुरुंदकरांचे 'व्यासांचे शिल्प' हाती घ्यायचे आणि त्यातल्या श्रीकृष्णावरच्या दोन प्रकारणांचे पारायण करायचे!
खरे तर ही दोन्ही प्रकरणे मुळातून वाचायला हवीत; पण त्यातले काही उतारे देण्याचा मोह आवरत नाहीय.

 राधेच्या पलीकडचा एक कृष्ण आहे ज्याबद्दल कुरुंदकर म्हणतात,
" ऐतिहासिक कृष्ण धूर्त राजकारणी आहे, कर्तृत्ववान आहे. गणांचा नेता आहे, पराक्रमाने आपले राज्य बिनधोक करणारा आहे, शेजारी राष्ट्रांना मित्र करून शत्रूंचा नाश करणारा आहे. या कृष्णाची पूजा भारताने कधी केलीच नाही."

कृष्णाचे भारताच्या सांस्कृतिक इतिहासातले महत्व त्यांनी फार सुंदरपणे उलगडून दाखवले आहे.
"श्रीकृष्णचरित्राविषयी बेजबाबदारपणे बोलायचे ठरले, तर पुष्कळ आहे, पण जबाबदारीने बोलायचे ठरवले तर काय बोलायचे, याच्याविषयी चिंता करण्यासारखे पुष्कळ पुष्कळ आहे. असे हे श्रीकृष्णाचे लोकविलक्षण चरित्र आपल्या डोळ्यांसमोर आहे.
 श्रीकृष्णाचे चरित्र भारतातल्या सर्व सांस्कृतिक जीवनाला जीवनाला आधारभूत म्हणून आहे. याचा अर्थ असा की, आमच्या नाटकांना, नृत्यांना, नानाविध चालीरीतींना आणि आपण ज्याला उत्तर भारतीय संगीत म्हणतो त्यातील अर्ध्या धृपदांना, ख्यालांना,ठुमरींना, कजरींना या जवळपास सर्व शास्त्रीय संगीताच्या संगीताच्या प्रकारांना श्रीकृष्णचरित्राचा आधार आहेत; तसेच भारतीय चित्रकलेचे मध्ययुगातले जे प्रमुख संप्रदाय आहेत, त्या प्रमुख संप्रदायांत तुम्ही पहाडी, कांगा, रजपूत व मुगल या इ. स. च्या चौदाव्या ते अठराव्या शतकापर्यंतच्या संप्रदायाची भारतीय चित्रकला शैली पाहिली, तर त्यातील मोगल शैली सोडून पहाडी, रजपुत, कांगा या तीन  चित्रशैलीतील जवळजवळ दोन-तृतीयांश चित्रे कृष्णाचे चरित्राची जोडली गेली आहेत. तेव्हा संगीताला, चित्राला, काव्याला, नाटकाला, नृत्याला अशा सगळ्या भारताच्या सांस्कृतिक जीवनाला श्रीकृष्णचरित्र आधारभूत राहिलेले आहे. या श्रीकृष्णचरित्राचे वैशिष्ट्य असे की जीवन जेवढे गुंतागुंतीचे आहे तेवढे हे चरित्र गुंतागुंतीचे आहे आणि जीवन जेवढे विविध आहे, तेवढे ते चरित्र वैविध्याने नटलेले आहे. जीवनातले जे सगळे चांगले आहे, ते श्रीकृष्णचरित्रात समाविष्ट झालेले आहे. म्हणून जीवनातल्या सामग्र्याचा प्रतिनिधी म्हणून पूर्ण परमात्मा या नात्याने श्रीकृष्ण आपल्या संस्कृतीमध्ये आहे, म्हणून ही जी श्रीकृष्ण नावाची 'पूर्ण परमात्म्याची' साथ आहे, ती आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, परंपरेचा आधार बनलेली आहे. त्यात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या सगळ्याच इतिहासामध्ये घडलेल्या आहेत असे समजण्याचे कारण नाही."

इतिहासातील असामान्य पुरुष हे सर्व कलांना, संस्कृतीला, तत्वज्ञानाला आधार कसे होतात हे पहायचे असेल तर कृष्णचरित्र अभ्यासायला हवे !

आणि राधा-कृष्णाचे प्रेम...त्यावरसुद्धा इतके सुंदर भाष्य त्यांनी केलंय!
" ज्या क्षणी राधा हे म्हणते की, "हे माझ्या प्रियकरा, तू माझ्याशी विवाह करावास, ही अपेक्षा नाही; नित्य सहवास लाभावा, हीही अपेक्षा नाही," त्या क्षणी हे प्रेम वासनेच्या पलीकडे निघून जाते! कारण सहवासाची, संरक्षणाची, प्रतिष्ठेची अपेक्षा नाही; त्या प्रीतीत वासना वर्ज्यही नाही आणि वासना त्या प्रीतीचा आधारही नाही! ती वासनेच्या पलीकडे निघून गेलेली आहे. ही जी निरपेक्ष प्रीतीची कल्पना राधेच्या रूपाने आमच्या संस्कृतीने उभी केली आहे, ती जगातल्या वाङ्मयातल्या 'प्रेम' या कल्पनेचे सर्वात मधुर व उदात्त असे स्वरूप आहे."


बुद्धिजीवी आणि बहुजन


गांधी कळायला फार वेळ लागतो, आणि डोळे सताड उघडे; तरी पूर्ण कळतीलच असे नाही...
नेमकं कुठल्या पुस्तकात ते आठवत नाहीय, पण गांधींचे एक वाक्य वाचले होते... "सुधारणा(reforms) व्हावी याची ओढ सुरुवातीला सुधारकांना असते, समाजाला नाही; त्यामुळे सुधारकांनी  लोकांकडून अज्ञापालनाची अपेक्षा करू नये, उलट प्रतिकूल प्रतिसादासाठी तयार असावं."
गांधीविचार प्रामाणिकपणे मानणाऱ्यातले सुद्धा किती जण या बाबतीत संयम ठेवतील?

गांधी हे केवळ आदर्शवादामुळे नव्हे, तर समाजमनाचे आकलन उत्तम असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला वश करू शकले. काही तात्कालिक अभिजनांना त्यांची जीवनशैली हास्यास्पद, त्यांच्या योजना बाळबोध वाटतही असतील; पण गांधींना सामान्य माणसाची भाषा कळत होती, आणि लोक त्यांच्याशी कनेक्ट करू शकत होते. त्यामुळे बहुसंख्य समाज गांधी बाबाच्या मागे उभा राहिला.

बहुसंख्य लोकांच्या प्रज्ञेवर अविश्वास दाखवून, त्यांच्या निर्णयक्षमतेला कमी लेखून, त्यांच्या निवडीची हेटाळणी करून  राजकीय बदल घडवण्याची अपेक्षा व्यर्थ आहे.
अभिजन जेव्हा बहुजनांबद्दल असा तुच्छतावाद दाखवतात, तेव्हा नेहमी विरोधकांचा फायदा होतो. हे अतिहुशार विचारवंत तुम्हाला सतत तुच्छ लेखतात, त्यांना तुमच्याबद्दल कसलीही आत्मीयता नाही; अशी लोक काय तुमचं भलं करणार, हा युक्तिवाद पटायला लागतो. आणि आपल्याला हसणारी लोक ज्या बाजूने आहेत, ती बाजू आपल्यासाठी वाईटच असणार, तेव्हा आपण त्याच्या उलट बाजूला जायचं, इतकं साधं गणित लोकांच्या मनात तयार होतं.

मग याचे परिणाम दिसले तरी  विचारांधतेमुळे, आपले आकलन इतर समान्यजनांपेक्षा खूप जास्त आहे या अहंकारामुळे, आपण कुठे कमी पडलो हे डोळसपणे न बघता परत एकदा लोकांना दोष देणे सुरूच राहते. आणि परत एक असेच वर्तुळ सुरू होते.


आदिम ओळख

अंघोळ करून नीट कोरडं न होताच घाईघाईत न्हाणीघराच्या बाहेर आल्यासारखा दिसतोय भोवताल. पावसाने काल चांगल्याच थापडा दिल्यात. काही झुडपं आडवी झालीयत, कुठे कुठे पाण्याची कागदी होडीही चालणार नाही इतकी छोटी छोटी डबकी तयार झालीयत. मुलांच्या काही सायकली आडव्या पडल्यात. बसण्यासाठीची बाकडी थोडी ओली थोडी कोरडी, निवडक आमंत्रण देत असल्यासारखी. कुठेतरी अर्धवट पाचोळा जळतोय...
फुलं मात्र आहेत; कुठे ओघळलेली कुठे उमललेली, पण रंगांची उधळण करत आणि सुगंध मिरवत अस्तित्व जाणवून देतायत. हे एक छानच असतं फुलांचं; प्रपात होत असतात... हे जगणं फुलणं गंधाळणं सोडत नाहीत.
अजून एक गंध येतो आहे; खूप दुरून की आपल्या आतूनच येतोय कळेना ... धूर आहे त्यात, आणि ओल्या झाडांचा करकरीत वास, थोडा तुरट, की कडवट ? जंगल आठवतंय, आणि काहीतरी खूप खूप जुनं, ... या जन्मातलंही नसेल इतकं जुनं. धूसर आकृत्या येतात डोळ्यासमोर.. जंगल, गुहा, धूर, शेकोटी...
किती जन्म हा गंध रुतला असेल जनुकांमध्ये.
बाकी काही कितीही बदलू दे, हा वेड लावणारा गंध माणसापुरता तरी अक्षय आहे...

आठवणीतली नागपंचमी


सकाळी सकाळी थोरल्या चुलतीचा फोन आला; भावाच्या हाती पाठवलेली शिदोरी, साडी-बांगड्या व्यवस्थित पोहोचल्या का,  विचारत होती. सगळे काय करतायत विचारलं तर म्हणाली ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा फस्त करतायत....
  श्रावण सुरू झाला की पहिला सण असायचा नागपंचमीचा. बायकांच्या खास जिव्हाळ्याचा सण. आमच्याकडे सासुरवाशिणी माहेरी यायच्या. साडी खरेदी, जिथं ते शक्य नाही तिथं किमान चांगलं ब्लाउजपीस घेतलं जायचं.
मेंदीचे कोन नव्हते, पण ठिपक्यांची मेंदी लावायच्या सगळ्या, काहीजणी पूर्ण तळवा रंगवायच्या.
बांगड्या भरणे मात्र सगळ्यांसाठी अनिवार्य सोहळा होता.
पंचमीच्या आदल्या दिवशी कासार यायचा आणि आमच्या खालच्या ओसरीत बसायचा. गावातल्या बायका तिथे गोळा व्हायच्या. काही तालेवार घरं होती, तिकडे बोलवायला जावं लागायचं. त्यांच्याकडे निरोप देत देत आम्ही बाकी लोकांसाठीही
"गौडुर मनिगे बळगार बंदेना, येल्लारू बर्ररी..." ( पाटलांच्या घरी कासार आलाय, सगळे या ) अशी हाळी देत रस्त्याने जायचो.
कासार कासारीण जोडीने यायचे; पण बांगड्या भरण्याचे काम चच्चाचे, बीबी फक्त बांगड्या काढून द्यायची आणि आलेल्या पोरी बाळींशी गप्पा मारायची. सगळे पैसे द्यायचे असे नाही. आमच्याकडून धान्य दिले जायचे, काही जणांच्या घरी घाणे होते, तिकडून तेल दिले जायचे. नंतर नंतर मात्र सगळा व्यवहार पैशात व्हायला लागला. तीन चार रंगाच्या चमकीचे ठसे असणाऱ्या काचेच्या बांगड्या असायच्या.. जास्तीत जास्त लहान साईझ चढवा ही मागणी असायची, कारण बांगड्या सैल असल्या की घरकाम करताना वाढायच्या. लहान मुलींसाठी प्लास्टिकच्या बांगड्या असायच्या. काचेची बांगडी येण्याइतका हात मोठा झाला की बीबी ओरडायची, "इसका इस साल देखो पाटलीन, छोकरी बडी हुई देखो".  छोकरी कुणाचीही असली तरी जबाबदारी पाटलीनीकडेच दिली जायची. मग माझी थोरली चुलती लगेच चौकशी सुरू करायची; सगळ्यांच्या माहितीतल्या स्थळांची उजळणी व्हायची. छोकरी उगीच गोरीमोरी व्हायची .
पंचमीच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असायचा, पण पोळ्या करण्याऐवजी पुरणाचे कानवले/ दिंडे केले जायचे.
आमच्याकडे वारुळाला जायची पद्धत नव्हती.
आजोबा भट्टीला ज्वारी न्यायचे आणि त्याच्या लाह्या करून आणायचे.
घरातल्या देव्हाऱ्यात शंकराची पिंड होती आणि त्याच्या डोक्यावर मोठा पितळी नागोबा.. पंचमीच्या दिवशी यांना फार महत्व यायचं. पूजा करून त्यांच्यावर दूध लाह्या वाहिल्या जायच्या. मग समस्त बहिणींचा उपवास सुटायचा (पंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठीचा उपवास असायचा; भाऊ असणाऱ्या सगळ्या हा उपवास करायच्या).
मोठे वाडे असणाऱ्यांच्या अंगणात झोके बांधले जायचे, आणि दुपारी सगळ्या मुली, बायका नवीन साड्या नेसून तिथे गोळा व्हायच्या.
लहान मुलींना परकर पोलके असायचे, काही शहरात राहणाऱ्यांचे फ्रॉक असायचे.
सगळ्या फेर धरून भुलई खेळायच्या, त्यात काही मराठी तर काही कन्नड गाणी असायची. माहेरची आठवण, आई वडिलांचं आणि भाऊ वहिनीचं कौतुक, सासरी असलेले कष्टाचे जीवन, अशी साधारण गाण्यांची गोष्ट असायची. माझी आजी एक गाणं म्हणायची ; मूळ गाणं आठवत नाही पण साटंलोटं झालेली(एका घरातल्या बहीण भावाचं लग्न दुसऱ्या घरातल्या भाऊ बहिणीशी करतात) एक माहेरी आलेली मुलगी आपल्या भावजय कम नणंदेला विनवते की तिने हिच्या आईवडिलांची नीट काळजी घ्यावी, बदल्यात ही आपल्या सासूचे रोज पाय चेपेल.
झोक्यासाठी गर्दी व्हायची, किरकोळ भांडाभांडी सुद्धा, पण मग एखादी ताई पुढे यायची आणि शिस्तीत सगळ्यांचे नंबर लावून द्यायची.
अंधार पडला की मग सगळ्या पांगायच्या.
पंचमीच्या दुसऱ्या दिवशीची आम्हा मुलांना फार उत्सुकता असायची. ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा हा नाश्ता त्यादिवशी सकाळी मिळायचा. पॉपकॉर्न हा पदार्थ माहीत नसलेला तो काळ होता; त्या चिवड्याचं प्रचंड अप्रूप होतं. आणि तेव्हा असे पदार्थ अगदी त्या सणापुरतेच मर्यादित असायचे. मुलांना आवडतात तर ठेऊ घरात वर्षभर, ही कन्सेप्टच नव्हती. त्या लिमिटेड एडिशन देशी पोपकॉर्नवर अक्षरशः तुटून पडायचो आम्ही सगळे.
मग आळसावत चुलीवरचा निरश्या दुधात केलेला चहा पीत कुणाची मेंदी फिक्कट झाली, कुणाचे नेलपॉलिश निघाले ते बघत ओसरीवर बसायचो. झोपाळा बाजूला रिकामा असायचा, कालच्यासारखे नंबर लागलेले नसायचे; पण आज कुणाला झोके घ्याचा फारसा उत्साह नसायचा ...

Wednesday, 9 October 2019

गुंफण गाण्यांची...


काल एका मैत्रिणीने एका गाण्यातून दुसरे गाणे आठवत जाण्याबद्दल लिहिलेले वाचले आणि मला बऱ्याच काळापासून एकत्र आठवणारी दोन गाणी आठवली.
मेहदी हसन यांनी गायलेली फ़राजची ' अब के हम बिछडे' ही गझल आणि लता मंगेशकर यांनी गायलेली सुरेश भट यांची  'मालवून टाक दीप' ही मराठी गझल.
दोन्ही गाण्यातले भाव अगदी वेगळे आहेत पण मला नेहमी एक ऐकलं की दुसरं आठवायचं. काल नेटवर शोध घेतल्यावर दोन्ही गाणी राग भुपेश्वरी (भूपश्री भूपकली) या रागात बांधलेली आहेत हे समजलं.
'मालवून टाक दीप' हे इरोटीक म्हणता येईल असं गाणं आहे. यात प्रदीर्घ विरहानंतर भेटलेला प्रियकर आहे, एकांत आहे आणि मिलनाची थेट मागणी करणारी धीट प्रणयिनी आहे.
यातलं प्रेम ताज्या नुकत्याच उमललेल्या फुलासारखं रसरशीत आहे. यात आवाहन आहे, आळवणी आहे आणि लाभलेले क्षणांत त्याच्याशी पूर्णपणे समरस होण्याची लालसा आहे.
"हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल ?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग ?"  हे विचारत ती एकमेकांत विलीन होण्याची, प्रेमात पूर्णपणे एकरूप होण्याची अपेक्षा करते आहे.
या गाण्याचे बोल शृंगारिक असले तरी चाल अशी आहे की गाणं गंभीर आहे असं  वाटत राहतं 😊.
(होस्टेलला असताना मी लावलेलं हे गाणं ऐकून एक उत्तर भारतीय मैत्रीण म्हणाली होती शीतल ऐसे रोने धोनेवाले क्लासिकल गाने क्यों सुनती रहती है हमेशा... मग तिला शिस्तीत एक एक कडव्याचा नीट अर्थ सांगितला; तेव्हा डोळे विस्फारून "कैसे भयानक गाने सुनते हो रे बेशर्म लोग" म्हणून हसायला लागली.)
याच्या अगदी उलट 'अब के हम बिछडे' हे  विरहगीत आहे.
मिलनाचा काळ संपून आता विरहाची चाहूल लागली आहे, आणि आता होणारी ताटातूट कायमची असणार याची जाणीवही आहे.
परत कधी भविष्यात भेट झालीच तर ती स्वप्नातल्यासारखी आभासी असणार आहे आणि तोवर प्रेमाचे फूल सुकून गेलेले असणार आहे.
पण यात विरहाच्या दुःखाकडे बघण्याचा एक तात्विक दृष्टिकोनही आहे . यातल्या प्रत्येक कडव्यात माणसाच्या बदलत जाणाऱ्या भावनांबद्दल एक इनसाईट आहे.

शेवटच्या "अब न वो मैं हूँ न तू है न वो माज़ी है "फ़राज़, जैसे दो शख़्स तमन्ना के सराबों में मिलें"
या ओळींमध्ये तर फराज नात्यांचे अशाश्वत असणे अधोरेखित करतो. तो म्हणतो,
"आता मी आधीसारखा नाही, तूही आधीची नाहीस, आणि आता तो काळही राहिला नाही; आपलं एकत्र येणं म्हणजे दोन व्यक्तींच्या आकांक्षांचे मृगजळ होते."
याचा एक वेगळा अर्थही लागतो... बिछडणे म्हणजे प्रत्यक्षात दूर जाणे असेही दरवेळी नसते; एकमेकांसोबत राहूनही माणसं बदलत जातात आणि मनाने एकमेकांपासून दूर जातात. मनांमध्ये हा कायमचा दुरावा आला तर मग एकत्र येणे हे निष्प्राण झालेल्या सुकलेल्या फुलांच्या निर्माल्यासारखे होऊन जाते.
या अँगलने वाचल्यावर सगळ्या गझलची नव्याने संगती लागते.
भुपेश्वरी हा नवीन राग आहे आणि यातली गाणी फार कमी आहेत; या रागात अजून एक गाजलेलं गाणं आहे..."चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा" ही कव्वाली.
शारीरिक उत्कट अधीर प्रेमाच्या  प्रकटनापासून ते प्रेम क्षणभंगुर असण्याबद्दलच्या प्रतिपादनापर्यंतचा प्रवास घडवणाऱ्या वरच्या दोन गाण्यांना या कव्वालीतला उत्पत्ती, स्थिती आणि लय हा
सिद्धांत लावून पाहिला, तर हा नियम जगाप्रमाणेच नात्यांनाही लागू आहे असे म्हणता येते...


पियानो की धुन पर

मघाशी एक कथा वाचत होते, त्यात नायक पियानो दुरुस्त करायचा असा उल्लेख आहे.
त्यावरून एकदम आपल्या हिंदी सिनेमांमधला पियानो आणि त्यावर गायलेली  गाणी आठवली.
जुन्या चित्रपटांमध्ये  पियानोवर एक तरी गाणं असायचंच. प्रसंगही बऱ्यापैकी ठरलेले होते.
 श्रीमंत नायिकापित्याचे आलिशान घर, जनम-दिन की दावत, नायिकेच्या प्रेमळ आग्रहाखातर आलेला गरीब घरचा नायक ... क्वचित एखादं व्हेरिएशन सोडलं तर सहसा हाच प्रसंग असायचा.
मग पियानो वाजवत नायक/ नायिका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्यार का इजहार करायचे. बाकी सगळी मंडळी(मुलीचे वडीलसहित) हातातली रंगीत द्रव्य सांभाळत अज्ञानात आनंद साजरा करायची. गरीब घरातल्या नायक हे पियानो वाजवायचे कसब बहुतेक कॉलेजातच शिकत असावा; रादर तो जे फर्स्ट क्लास फर्स्ट यायचा, त्यातला एक फर्स्ट तरी या पियानोवादन प्राविण्याचाच असावा..
दुसरा प्रसंग मात्र शिरेस असायचा, जुदाईचा. यात थोडी व्हरायटी असायची...  गैरसमज/ जालिम दुनिया/ हिरॉईनने मजबुरीत नकार देणं आणि हिरोला ती बेवफा वाटणं... मग त्यानुसार पत्थर के सनम असे दोषारोप, किंवा चलो एक बार फिर से अजनबी बन जाये, असं लायसन्स टू लीव्ह प्रपोजल असायचं.
काही गाण्यात हिरो एखाद्या हॉटेलमध्ये गात असायचा आणि हिरोईन रकीब के साथ यायची, मग हिरो त्वेषाने पियानोच्या कीज बडवत नायिकेच्या भावनांना जोरदार आवाहन करायचा, रकीब परत अज्ञानात आनंद मोडमध्ये गाणं एन्जॉय करायचा.

अजून एक प्रकार असायचा... मुग्ध नायिका अपनी ही लगन में मगन स्थितीत एखादं लडिवाळ स्वगत गात असायची आणि कव्हरेज क्षेत्रात असलेले किंवा आगमन झालेले कधी नायक तर कधी व्हिलन मनात मांडे खायला लागायचे...

काही गाणी मात्र सिनेमाचं थीम सॉंग असायची आणि चित्रपट भर अधून मधून वाजत राहायची. मेरी जंग सिनेमात तर नुसतं गाणच नव्हे, तर महाभारतातल्या रथाचे चित्र असलेल्या पियानोला सुद्धा विशेष महत्व होतं.
पियानोचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा की सगळे शिस्तीत एका जागी बसून, उभे राहून, फार तर एखादी फेरी मारत गाणं पूर्ण करायचे; आतासारखी आचरट स्टेप्स करत नाचायची सक्ती नव्हती...

आताशा बहुतेक इतकी सवड नसते कुणाला; दिलवाले मध्ये अजय देवगणने 'एक ऐसी लडकी थी' म्हटल्यानंतर आणि धडकन मध्ये सुनील शेट्टीने 'तुम दिल की धडकन हो' चा उद्घोष केल्यानंतर फार कुठे पियानो दिसला नाही .

अजून एक हटके गाणं आहे ज्यात पियानो आहे; बहुदा ही एकमेव अंगाई असेल जी आईने न गाता दोन नायकांनी गायली आहे.
'दुनिया दिलवालों की' नावाचा एक डब सिनेमा आला होता, त्यातलं "जा री जा, ऐ हवा, शोर तू न मचा..".. हे एक फार म्हणजे फार गोड गाणं आहे...