Saturday, 30 November 2019

कोडं सुटताना..



माझ्या जुन्या क्लिनिकच्या खिडकीतून एक आंब्याचे झाड दिसायचे. तेव्हा मुलं लहान होती; खूप धावपळ करत, घरचं सगळं आवरून मी क्लिनिकला यायचे. इथलं काम उरकत आलं की मग मात्र दहा पंधरा मिनिटं अगदी शांत बसायचे. खाली चहाटपरी चालवणाऱ्याचा मुलगा चहा घेऊन यायचा.
हातात चहाचा कप घेऊन दरवाज्याला खुर्ची पाठमोरी करून मी त्या झाडाकडे बघत राहायचे ते क्षण फार रिलॅक्सिंग असायचे. रोज शांतपणे झाडाचा तो खिडकीतून दिसणारा भाग बघणं; दुसरं काहीच डोक्यात नसायचं.
 आंब्याला हळूहळू मोहोर आला, मग फळं आली, मग त्यावर पोपटांचे थवे यायला लागले. झाड रहदारीच्या रस्त्यावर अंग चोरत वाढलेलं, फार डेरेदार नव्हतं; आणि धुळीनं माखलेलं असायचं...रस्त्यावरून पटकन फळं दिसायचीही नाहीत. कुणी दगड वगैरे मारणंही शक्य नव्हतं, आणि कुणी कधी चढलंही नाही झाडावर, विजेच्या तारा होत्या जवळच. आंबे निर्धास्त वाढत होते. पोपटांनी अर्धवट खाल्लेली फळं उन्हात पाहिली की 'पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले', चे प्रात्यक्षिक बघतोय असं वाटायचं.
एका दिवशी वळीवाचा जोरदार पाऊस आला, सोबत सुसाट वाराही... झाड खूप दिवसांनी अंघोळ करून अगदी लखलखीत झालं, आणि फांद्या झोके घ्यायला लागल्या; पण ते हिरवे-पिवळे आंबे गायब झाले एकदम. पाऊस थांबल्यावर घरी जायला निघाले तर खाली झाडाभोवती त्या हिरव्या पिवळ्या आंब्यांचा रसदार खच पडलेला... काय वाटलं नेमकं कळलं नाही, पण तो सडा पाहून 'आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो' या ओळी मात्र खूप वेळ आठवत राहिल्या होत्या... घरी जाऊन लेकीलाही या ओळी शिकवल्या होत्या आणि त्या उन्हाळ्यात ती सारखं म्हणत असायची हेही आठवतंय.
एखादं चित्र नीटसं कळू नये पण कायमचं स्मरणात  राहावं, तसं त्या दुपारी पाहिलेलं ते दृश्य मनात कोरलं गेलं .
आता आठ नऊ वर्षांनी या अनुभवाशी मिळता जुळता अनुभव वाचायला मिळाला, त्या ओळींसकट, आणि तेही अशा किमयागाराचा, की स्तिमित व्हायला झालं.
त्या चित्राची न लागलेली संगतीही आपुसकच लागली. 

त्या लेखकाच्या लेखाचा तो भाग खाली देत आहे:

" 'आंबा पिकतो...रस गळतो' ही ओळ माझ्या मनात पूर्ततेची वाट पाहत पडलेली होती.
तो पिकलेला आंबा, त्याचा तो अंतर्यामातून
बाहेर फुटू पाहणाऱ्या आनंदासारखा गळणारा रस.... आणि मग कोकणचा हा झिम्मा खेळणारा राजा कोण? दुसरा कोण? तो आंबाच! तोच झिम्मा खेळतोय. मला हे सत्य खुद्द एका आंब्याच्या झाडाकडूनच कळलं. वर्षानुवर्षे अपूर्त राहिलेली ही समस्यापूर्ती माझ्या दारातल्या एका आंब्यानंच केली.---
---- आंबा मात्र लुटून लुटून किती लुटाल?- असं म्हणत राहिल्यासारखा स्तब्ध उभा. शिवाय, तसा तो कोणाचाच नव्हता, त्यामुळे या फळांवर कोणी राखण्या ही नव्हता. फळं पाडाला आल्यावर लांब काठीला जाळ्याची पिशवी लावून त्या आंब्यावरची असंख्य फळं कुणी आस्थेनं उतरवणाराही येत नाही. आज इतकी वर्ष मी पाहतोय निम्म्याहून अधिक फळे झाडावरच राहतात. आंधळ्याच्या गाई देव राखतो म्हणतात, तशी आमच्या या आंब्याची फळं आपोआप राखली जातात. बरं, हा आंबाही हापूस पायरी वगैरे नामांकित आंबाही हापूस, पायरी वगैरे नामांकित वंशातला नाही. फळ मात्र रेखीव आहे. पुणेरी पगडीला असे तशी त्याला कोचही आहे. ते लटकलेले घोस पाहत बसावे असे असतात
 आणि मलाही आश्चर्य वाटतं म्हणजे लांबशा काठीने त्या फळांचा घोस सहज काढता येण्यासारखा असून मलाही कधी त्या फळाची चव घ्यावीशी वाटली नाही. मला वाटतं, त्या प्रत्यक्ष आस्वादाची इच्छा नसलेल्या प्रेमालाच 'प्लॅटॉनिक लव' म्हणत असावेत. त्या आंब्याच्या साहचर्यातच सारं काही मिळतं. आणि केवळ मोसमातलं साहचर्य नव्हे; प्रत्येक दिवसाचं साहचर्य.
ते घोस तसेच लटकत राहतात. आणि मग पोपटांच्या कानी ती वार्ता जाते. 'किर्र किर्र' करत ती कीर-धाड येते तेव्हा कळतं की वरून फारसा पिवळा न दिसणारा हा आंब्याचा घोस आता पिकलाय. त्या हिरव्या पानांत ते राघो भरारी कुठं लपून आणि कसे ते आंबे खातात ते त्यांनाच ठाऊक. पोपट आलेले दिसताहेत, म्हणत गॅलरीत यावं तर एक पोपट दिसत नाही आणि मग आंब्याच्या त्या पानांनाच पंख फुटावेत तसा एकदम तो हिरवा जथा भरारी घेऊन पाहता पाहता दिसेनासा होतो.
 पिकलेल्या आंब्यांचे घोसच्या घोस मिरवत आता आमचा अंबा उभा असतो. क्वचित वळिवाचा पाऊस येऊन त्याला दणदणीत शॉवरबाथ देऊन जातो. पाच-पन्नास फळं खाली पडतात. पण आंबा मात्र धुंदीत असतो. त्याच्या नसानसांतून वाहणारा रस त्या फळांतून गळताना त्याला दिसत असतो. आणि वळीवाच्या वादळी वाऱ्याबरोबर तो झुलायला लागला की ते घोसही झुलायला लागतात. आता कोणी न खुडताच एक एक फळ दबकन खाली पडतं.त्या झुलण्यात आपण सफल झाल्याची एक कृतार्थता असते गॅलरीत आपण सफल झाल्याची एक कृतार्थता असते. गॅलरीत पावसाची झड येत असते, तरीही मला ते झुलणं पाहण्याचा मोह आवरत नाही. दहा वेळा मी चष्मा पुसतो.
 'आंबा पिकतो...रस गळतो... कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो' ह्या झिंग आणणाऱ्या झिमम्यातल्या पहिल्या साक्षात एका अलौकिक अनुभवानंच समस्या-पूर्ती झालेली असते."
-- पु.ल. देशपांडे.

एखादं माणूस आयुष्यात आल्यावर "काश, तुम मुझे बहुत पहले मिले होते!" असं म्हणावं वाटतं... पुलंच्या बाबतीत तसं झालंय !
प्रेमाला वयाची अट नसते म्हणे... सिम्पली लव्हिंग धिस आजोबा 😊😊

मला कळलेला मॅट्रिक्स



काही चित्रपट पाहताना मनोरंजक वाटतात, तो तेवढा वेळ छान जातो आणि मग आपण त्यांना विसरून जातो. काही मात्र नंतरही आठवणीत राहतात.
 काही सिनेमे मात्र सुरुवातीला अगम्य भासतात; आपण त्यांच्याशी रिलेट करू शकत नाही असे वाटते. पण यांची वेळ आयुष्यात येतेच 😊, मग ते मनावर गारुड करतात आणि आपल्याला विचार करायलाही भाग पाडतात..
Matrix trilogy अशीच पाहण्यात आली;  स्पेशल इफेक्ट्सने सजलेला एक साय-फाय चित्रपट इतकीच प्रतिमा डोक्यात असताना एकदा हे प्रकरण सलग बघण्याचा योग आला आणि एखादे कोडे सुटले नाही की जसे अस्वस्थ वाटत राहते तसे होत राहिले. मग या भुलभुलैय्याबद्दल बघत, वाचत समजून घ्यायचा प्रयत्न केला. हा शोधप्रवास भन्नाट होता.
 ऍनिमेटेड किंवा साय फाय सिनेमात तात्विक धागा गुंफलेला असला की त्याला समजून घ्यायला मजा येते..या चित्रपटत्रयी मध्ये तर असे अनेक धागे गुंफलेले आहेत.

चित्रपटाचा विषय बराच क्लिष्ट आहे, पण मला जे जाणवलं ते मांडण्यापूर्वी या कथेची पार्श्वभूमी थोडी तरी परिचित असणं आवश्यक आहे,  म्हणून ज्यांना हा चित्रपट माहीत नाही त्यांच्यासाठी या भागात थोडक्यात कथाविषय मांडते.

मॅट्रिक्सची कथा भविष्यकाळात (बाविसाव्या शतकात) घडते. थोडक्यात कथा अशी आहे:
 निओ नावाच्या एका कम्प्युटर प्रोग्रामरच्या लक्षात येते की तो राहतोय ते जग आभासी आहे; मॅट्रिक्स नावाच्या एका विशाल कॉम्प्युटर प्रोग्रामचा भाग आहे जो रोबोटिक मशिन्सनी(AI) डिझाइन केलेला आहे.  जगावर मशिन्सची सत्ता आहे आणि ते ऊर्जेचे स्रोत म्हणून मानवांचा वापर करत आहेत.
मॉर्फियस, ट्रिनिटीसारखी काही मोजकी मंडळी आहेत ज्यांना सत्य माहीत आहे आणि ते झिऑन नावाच्या एका गुप्त आश्रयस्थानातून मशिन्सविरुद्ध लढा देत आहेत व  मॅट्रिक्स आणि मशीन जगत नष्ट करून मानवांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात ओरॅकल नावाची एक भविष्यवेत्ती आहे जिने "The one" ची भविष्यवाणी(prophecy) वर्तवली आहे, जो या लढ्यात माणसांना विजय मिळवून देईल. निओच तो the one आहे यावर झिऑनच्या रहिवाशांचा विश्वास आहे .
या मशिन्सविरुद्धच्या लढ्यात निओ सामील होतो आणि स्वतःकडे असलेल्या superpowers जाणवल्यावर  त्याचाही या भविष्यवाणीवर विश्वास बसायला लागतो.
यात Agents नावाचे कॉम्प्युटर प्रोग्राम्सही आहेत, जे मॅट्रिक्सचे संरक्षक आहेत. ते या लढणाऱ्यांच्या विरोधात लढत असतात आणि मॅट्रिक्स सुरक्षित ठेवत असतात. यांचा प्रमुख एजंट स्मिथ असतो, ज्याला या कथेचा मुख्य खलनायक म्हणता येईल.

Matrix,  Matrix Reloaded, आणि Matrix revolutions या  तीन भागांमध्ये विस्तारलेल्या या चित्रपट कथेत नंतर निओला मॅट्रिक्सचा निर्माता (Architect) याच्याकडून समजते की झिऑनचे अस्तित्व आणि 'The One' ची prophecy सुद्धा मॅट्रिक्सच्या निर्मात्याचीच खेळी असते , जी विद्रोही मनुष्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी, सीमित विद्रोह करण्याची मुभा देण्यासाठी आणि मॅट्रिक्सला स्थिर ठेवण्यासाठी रचलेली असते. असे मॅट्रिक्स आणि झिऑन याआधीही निर्माण होऊन नष्ट झाले असतात आणि तात्कालिक The one च्या मदतीने परत झिऑनचे पुनर्निर्माण झालेले असते.
या वेळी  निओ मात्र आधीच्या the one नी निवडलेला पर्याय न निवडता वेगळा मार्ग निवडतो आणि त्यामुळे पुढचा घटनाक्रम बदलतो.(आधीच्या the one पेक्षा वेगळा मार्ग निओ चोखळतो, त्याला कारण असतं त्याचं ट्रिनिटीवर असलेलं प्रेम, आणि आता काही प्रोग्राम्सदेखील मनुष्यांसारखे प्रेम आणि कर्तव्य या भावना आचरणात आणू लागल्या आहेत याचे त्याला झालेले ज्ञान. )
 त्याचवेळी स्मिथ या अनियंत्रित झालेल्या एजंटमुळे मनुष्य, मशीन्स आणि मॅट्रिक्स या सगळ्यांनाच कायमचे नष्ट होण्याची शक्यता निर्माण होते. या धोक्याची जाणीव निओ मशिन्सना करून देतो आणि झिऑनमधल्या माणसांना जीवदान मिळण्याच्या बदल्यात तो स्मिथला नष्ट करण्याची तयारी दर्शवतो. सहजीवनाच्या त्याच्या या प्रस्तावाला मशीन्स मान्यता देतात आणि स्मिथविरुद्धच्या लढ्यात त्याला मदत करतात. पण हे करताना त्याला स्वतःच्या जीवाची आहुती द्यायला लागते.

शेवटी मॅट्रिक्सच्या निर्माता(Architect) ओरॅकलला सांगतो की आता शांतता प्रस्थापित झालेली आहे, आणि मॅट्रिक्समधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या मनुष्यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य असेल. आणि सती नावाच्या दोन  प्रोग्राम्सच्या प्रेमातून निर्माण झालेल्या मुलीने साकारलेल्या सूर्योदयावर चित्रपट संपतो .

मॅट्रिक्स ट्रियोलॉजी मध्ये बऱ्याच संकल्पना, बरेच सिद्धांत आहेत.
Matrix is actually a matrix of lot of themes and subtexts😊.
पण मला जाणवलेली सगळ्यात प्रमुख संकल्पना म्हणजे
  "There is no absolute victory."(निर्विवाद विजय असे काही नसते)

दोन प्रवृत्तींचा/समूहांचा/ संस्कृतींचा संघर्ष आणि जेत्याने पराभूतावर निर्विवाद वर्चस्व मिळवण्याचा किंवा त्याचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न, पण शेवटी ते अशक्य असल्याचे लक्षात आल्यामुळे दोन्ही बाजूंनी सहजीवनाची तयारी; आणि हे करत असताना काहीजणांना for the greater good करावा लागणारा त्याग, हा घटनाक्रम  काळाच्या पटावर कितीतरी वेळा परत परत घडला असेल.
यातल्या भ्रमात जगणाऱ्या मानवांची तुलना गुलामीला चांगलं मानून समाधानी राहणाऱ्या सामान्यजनांशी करता येईल. ठराविक power holders निवडस्वातंत्र्य असल्याचा भास तयार करतात , आणि बहुतांश लोक त्यांना(शासकांना) अपेक्षित असलेली निवड करून निष्क्रियपणे स्वतःचे प्राक्तन स्वीकारून त्यात सार्थकता शोधत आयुष्य घालवतात.
मात्र काही जागरूक स्वतंत्र वृत्तीची माणसं बंडखोरी करतात. पण यंत्रणा इतकी धूर्त असते की त्यांनाही एका परिघातच बंड करू देते आणि कालांतराने ते बंड गिळंकृत करते . ही सायकल रिपीट होत राहते.
पण या चकव्यावर मात करणारा एखादा खरा 'the one' असणारा प्रवर्तक अवतरतो, जो सगळे पूर्वानुमान मोडीत काढत अगदी नवी वाट चोखळतो. इथे सिस्टम हतबुद्ध झाल्याचे भासते. पण संघर्षाच्या एका टप्प्यावर त्यालाही जाणीव होते की पक्षपाती, अन्यायकारक भासली तरी तीही थोडीफार त्याच्यासारख्याच घटकांनी बनलेली यंत्रणा आहे, जी नामशेष करणं शक्य नाही. पारडे ताकदीच्या प्रमाणात इकडे किंवा तिकडे सरकले तरी दोन्हीत समतोल साधणे हाच त्यातल्या त्यात कमी संहारक पर्याय आहे.
त्याचवेळी यंत्रणेच्या चालकांनाही जाणीव होतेच, की असा सगळा समूह टाचेखाली ठेवणे अशक्य आहे; शिवाय त्यात पूर्ण सिस्टमच्या विनाशाचा धोका आहे. त्यात कालौघात यंत्रणेतले काही भाग बंडखोरांबाबत सहानुभूती बाळगायला लागतात, त्यांचे काही गुण अंगीकारायला लागतात.
त्यामुळे शांतता कायम ठेवण्यासाठी, अराजक टाळण्यासाठी, यंत्रणा चिरेबंदी न ठेवता शिथिल करावी लागणे आवश्यक होऊन जाते. आणि मग दोन्हीकडून शांततापूर्ण सहजीवनासाठी सहमती होते .

ही थेअरी बऱ्याच ठिकाणी लागू होईल:
हुकूमशाही किंवा राजेशाही  वि. लोकशाही,
विदेशी आक्रमण वि. स्वातंत्र्यलढा,
अगदी पुरुषतत्व वि. स्त्रीतत्व संघर्ष सुद्धा 😊, (यातले आर्किटेक्ट आणि ओरॅकल मला या दोन तत्वांचे रूपक वाटतात)

दुसरी थीम मानवाच्या मूलभूत design बद्दल आहे.

"Man needs freedom of choice."

आपले आयुष्य आपण घडवतो, कशा प्रकारचे आयुष्य जगायचे याची निवड करणे आपल्या हातात आहे, आणि आपल्या जगण्याला काहीतरी प्रयोजन आहे ज्याची पूर्तता करण्यात जीवनाचे सार्थक आहे, या समजुतींमुळेच माणूस कृतिशील, उद्यमी बनतो आणि मनुष्यजातीची प्रगती होते.
  सगळ्या प्रकारचे अनुभव घेणे हे मानवी आयुष्याचे प्रयोजन आहे. म्हणून एकसुरी perfection सुद्धा त्याला मानवत नाही. Utopia शी तो तादात्म्य पावू शकत नाही.
 (माणसात असलेली ही anamoly लक्षात न घेतल्यामुळे मॅट्रिक्सची आधीची versions अयशस्वी ठरतात.)

तिसरी संकल्पना उत्पत्ती स्थिती आणि लय याबद्दल आहे
"Everything that has a beginning has an end."

 खूप प्रयत्न करून,आपल्या बुद्धीने, कष्टाने माणूस प्रगतीची अत्युच्च पातळी गाठतो, संस्कृती उत्कर्षबिंदूला पोहोचते, पण तिथून पुढे ती तशी कायम राहत नाही.
कारण नंतर सगळेच सहज उपलब्ध होते. त्यामुळे लोक आळशी, बेजबाबदार, बेदरकार आणि ध्येयहीन होतात. आणि काही काळाने तिचा ऱ्हास सुरू होतो.
थोडक्यात मनुष्यजातीची वाटचाल एकरेशीय पद्धतीने न होता ती पुनरावर्तनीय असते. प्रत्येक यंत्रणा उत्पत्ती स्थिती लय या चक्रातून जाते; प्रत्येक जन्मात अंताची बिजे लपलेली असतात, आणि प्रत्येक अंतात एका नवीन सुरुवातीची ...

-------------------------------------------------------

या ट्रायलॉजीच्या शेवटच्या भागात निओचे जे evolution आहे तेही खूप रोचक आहे.
 तो आणि स्मिथ सामर्थ्याच्या दृष्टीने शेवटी शेवटी एकमेकांसारखेच होतात; पण दोघांत एक मूलभूत फरक आहे .
स्मिथने स्वतःचा विजय असलेला शेवट पाहिलेला आहे आणि तो त्यामुळे निर्धास्त आहे, पण त्याला निओचे प्रतिकार करणे कळत नाही. तो एक प्रोग्राम केलेली मशीन आहे; पराजय दिसत असतानाही श्रद्धेने लढत राहण्याची निवड करणारा माणूस, एखाद्या मूल्यावर विश्वास ठेवून त्या मूल्यासाठी, ध्येयासाठी स्वतःची आहुती देण्याची निवड स्वेच्छेने करणारा माणूस त्याला कळत नाही. निवड ही संकल्पनाच त्याला कळत नाही .
आणि म्हणूनच त्याला न समजलेल्या निवडीच्या पल्याडचा खरा शेवट स्मिथ पाहू शकत नाही.
दुसरीकडे निओची मात्र समज वाढली आहे,  घटनांमागचा कार्यकारणभाव समजण्याइतकी जागृती त्याच्यात आली आहे.
 निओने प्रेम अनुभवले आहे. माणसासारखेच मशीन्सही प्रेम करण्याइतक्या उत्क्रांत झाल्या आहेत हे कळल्यावर त्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. मशीन्स आणि मॅट्रिक्स नष्ट करण्याऐवजी सहजीवन आणि शांती हे त्याचे ध्येय झाले आहे.

यासाठी स्मिथला नष्ट करणे गरजेचे आहे हे त्याला कळले आहे. एका क्षणी हा हेतू साध्य करण्यासाठी स्वतःची आहुती देणे आवश्यक आहे हेही त्याला समजले आहे, आणि त्याने त्या उपायाची सजग निवड केली आहे.
 तो उगमापर्यंत जाऊन आला आहे; जगातला कुठलाही एक घटक संपवण्यापेक्षा  आहे त्या जगावर समग्र प्रेम करण्याची सम्यक दृष्टी त्याला लाभली आहे. हा त्याच्या वैयक्तिक  उत्क्रांतीचा सर्वोच्चबिंदु आहे.

अजून एक गंमत म्हणजे इतक्या क्लिष्टतेनंतर, इतक्या तांत्रिक प्रगतीनंतर  उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर येऊन मशीन्समध्ये त्यांच्या निर्मात्यांसारखी (माणसांसारखी) प्रेम ही भावना निर्माण झाली आहे. आणि  it has made all the difference.
 निओ ट्रिनीटीचे प्रेम; ओरॅकलच्या मनात मानवजातीविषयी प्रेम आणि सद्भावना निर्माण झाल्यामुळे तिने अप्रत्यक्षपणे निओला मार्गदर्शन करणे; राम आणि कमला या प्रोग्राम्सना एकमेकांविषयी वाटणारी प्रेमभावना आणि त्यातून त्यांनी केलेली सती या मुलीची निर्मिती, हे या कथेतील खरे game changers आहेत.

या सगळ्या अंतःप्रवाहांमुळे मॅट्रिक्स एक सरधोपट ऍक्शन मुव्ही न राहता त्यापलीकडे जाऊन गुंतवते आणि गुंगवते; आणि संघर्ष करणारे समूह बदलत जातील, पण अस्तित्व टिकवायचे असेल तर शेवटी प्रेम, समावेशकता, सहजीवन या कालातीत मूल्यांनाच शरण जावे लागेल, या निष्कर्षापर्यंत येऊन ठेपते.

बाई असणं



" कसलं भयानक झालं गं ते हैदराबादमध्ये"
"हो"
" आपल्या पोरींसाठी भीतीच वाटते असं काही ऐकलं की"
"हम्म😢"
" आणि तू  तुझ्या पोरीला एकटी नको पाठवत जाऊ इकडे तिकडे. सायकलवर बऱ्याचदा जाते ना सामान आणायला"
" हो, शाळेसाठी स्टेशनरी लागली तर, कधी एखादी भाजी, काही ग्रोसरी लागली तरी आणते, तिला जमतं व्यवस्थित आणि आवडतं ही"
" हो गं, पण सेफ्टीचं काय, कशाला रिस्क घ्यायची... एका एजपर्यंत तरी जपायला हवं ना आपणच"
" किती असतं?"
" काय?"
" नाही, तू म्हणते ते एज नेमकं किती असतं... नेमकं किती वय झालं की म्हणायचं आता ती सेफ आहे, आता तिच्या फिमेल होण्याचा काहीच त्रास नसणार तिला. किती वय झालं की तिला विसरता येईल की तिने जपून राहायचंय?"

अवखळ झऱ्यासारखं बालपण निर्मळपणे वाहत असतं... कुठल्याश्या एका किळसवाण्या स्पर्शाने, शब्दाने, गढूळ होतं आणि पहिल्यांदा कळतं आपण बाई आहोत.
 स्वप्नांच्या दुनियेत वगैरे रमण्याचे दिवस येतात मग; आणि स्वप्नांपेक्षा दुस्वप्नं जास्त दिसू लागतात. शरीराच्या कौतुकसोहळ्याएवजी अडथळा व्हायला लागतो त्याचा येता जाता; शाळेत कॉलेजात, रस्त्यावर, दुकानात, मंडईत, बसमध्ये... कुणी अचकट विचकट बोलतं, कुणी धक्का मारतं, कुणी सायकलला कट मारतं... ओढणी नीट घ्यायची, पोक काढून चालायचं, पुस्तकं समोर धरायची, मान खाली तोंडावर बोट... अशा लोकांशी हुज्जत घालायची नाही, विरोध केला आणि चेकाळून अजून काही भयंकर केलं म्हणजे? आपल्याला फक्त शिकून पुढे जायचंय.. दुर्लक्ष करायचं...
मग कॉलेज असतं, हुशार लोकांचं...पण इथे तर  क्लासरूमच्या भिंती असतात, कॅन्टीनच्या भिंती असतात, लायब्ररीच्या भिंतीही असतात... जपून राहायचं, नाहीतर यापैकी कुठेही जाहीर उद्धार होतो, मग तुम्हाला बघायला गर्दी होते कोरिडॉर्समध्ये. ज्यांनी लिहिलंय त्यांच्याकडे तिरस्काराने कुणी बघणार नाही, हिम्मतच होणार नाही, राजे असतात ते इथले... तुझ्याकडे बघतील लोक, कुतूहलाने... "काय नेमकं पोटेन्शियल आहे, काय मोजमापं आहेत बघू तरी...हिनेच काहीतरी सिग्नल दिला असणार... " . बकऱ्यांकडे बघायला आवडतंच आपल्याला, लांडग्यांकडे बघायची रिस्क घ्यायची नाही फक्त.
परीक्षा येतात; त्यात कुणी विचित्र प्रश्न विचारतात; शरीराशीच जोडलेला सगळं अभ्यासक्रम, काहीही विचारता येतं, सगळंच असतं सिलॅबसमध्ये. सिनियर मुली सांगतात; या तोंडी परीक्षेला नीट ओढणी घेऊन जा, तोंडाला तेल लावा हवं तर, नजर खाली ठेवा, आवाज कमी... ऐकायचं मग... त्याही काळजीनेच बोलत असतात.
सोबतची मुलं म्हणतात पोरींचं बरं असतंय, जरा टाईट ड्रेस घातले की पास; रात्रभर अभ्यास करून लाल झालेले डोळे चुरचुरायला लागतात; ही परत म्हणतात रडणं हा तर रामबाण नुस्खा तुम्हा पोरींचा, लगेच पास करतात तुम्हाला...
सगळंच कडू कडू झालेलं असताना वडील म्हणतात कधीही पूर्ण समूहाबद्दल राग धरू नये, हे individual असतं. ज्यांच्याबद्दल द्वेष वाटतोय त्यांच्यातल्या चांगल्या लोकांची यादी कर; बघ तुझी भावना बदलेल.
बरीच मोठी होते यादी... आहेत की चांगले पुरुष जगात म्हणत ती यादी मनात नीट जपून ठेवायची. अप्रिय प्रसंगी तीच आठवून स्वतःची समजूत घालत राहायचं.
पुढचा टप्पा येतो उच्चशिक्षणाचा; आणि त्यासोबत पुढच्या पातळीवरचे खाचखळगे..
नवरा आपल्याच संस्थेत नोकरी पत्करून सोबत राहायला आला की मग मात्र झटक्यात सगळं सुकर होतं. नुसती रेसिडेंट नसतो आता; लेक्चररची बायको असतो, योग्य तो रिस्पेक्ट राखलाच पाहिजे ना सरांच्या मिसेसचा.
पुढे सोबतीने व्यवसायात जम बसवताना त्याच्या पंखाखाली आपण सुरक्षित... एकट्या स्ट्रगल करणाऱ्या बायकांच्या वाट्याला येणारा त्रास आपल्याला भोगावा लागत नसला तरी दिसत असतो. अशावेळी  हुश्श म्हणावं की गिल्टी वाटून घ्यावं, हे कधी कळत नाही. पण या परिघाबाहेर गेलं की चटके फटके हजर असतात. कुणा हाय रिस्क प्रेग्नन्सीला इमर्जन्सी साठी फोन नंबर दिलेला असतो, तिचा नवरा त्यावरून घाण फोटो व्हीडिओ पाठवतो आणि आपण अवाक होतो. कुणी एकटीचा फोटो का ठेवता मॅडम फेसबुकला म्हणत जाब विचारतं. एखादा तथाकथित कौटुंबिक मित्र तर चेष्टेत "वहिनी फार ऍक्टिव्ह असतात बरं फेसबुकवर, मित्रही बरेच आहेत यांचे तिथं, सागर जपून रहा बे," असं सरळ म्हणतो आपल्यासमोर... आपण हतबुद्ध होऊन बघत राहतो नुसते....
चाळीशी ओलांडली की वाटतं आता झालं वय, आता थोडं पल्याड जाता येईल; पण असं काही फिक्स एजच नसतं म्हणे.
चांगल्या गोष्टी, चांगली माणसं आठवत, वाईट ते विसरत रुटीन सुरक्षित आयुष्य जगत असतो. किरकोळ वाईट प्रसंग घडत राहतात पण निबर झालेलो असतो आता... कधी दुर्लक्ष करून, कधी शिव्या देऊन, कधी धमक्या देऊन निस्तरतो विषय... फार चिडचिड झाली तर मनातल्या यादीची उजळणी करतो.
... मग एखादं नृशंस प्रकरण उजेडात येतं, मग अशा प्रसंगांची यादीच डोळ्यासमोर येते; मग ती मनातली चांगल्या पुरुषांची यादी काही केल्या आठवतच नाही.
  इतक्या अमानुषपणे जीव का घ्यावा कळत नाही. इतकी विकृती कशी फोफावते कळत नाही. नवऱ्यावरच आगपाखड होते तुम्ही पुरुष इतके नीच कसे बनता म्हणत.
आपला संताप, घृणा सगळं खालमानेने स्वीकारतो तो; आणि काहीतरी सांगत राहतो कसे उपाशी असतात, चेकाळतात काहीतरी पाहून... शरीराच्या उर्मी रेग्युलेट करायला नैतिक, सामाजिक, धार्मिक, कायदेशीर, असा कुठलातरी लगाम असायला लागतो... या लोकांमध्ये यापैकी कुठलाच वर्किंग नसतो आणि मग त्यांच्यातला पशु बेफाम होतो...
माझ्यापर्यंत काही पोहोचत नाहीय पण; खरंच नको जाऊ द्यायला मुलीला इकडे तिकडे? तिचं शॉर्ट्स घालणं बंद करावं आतापासूनच... काय काय बंद करता येईल बरं.... आणि हे सगळं किती वयापर्यंत... हा ही एक प्रश्नच आहे तसा


 


दुसरी बाजू

कोशिश सिनेमात एक सीन आहे.
 त्यातले दाम्पत्य मूकबधिर असते. त्यांना मूल होते तेव्हा ते नॉर्मल आहे की नाही याची त्यांना खूप काळजी वाटत असते. मग ते एक खुळखुळा वाजवून मुलाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. मूल प्रतिसाद देत नाही तेव्हा घाबरून डॉक्टरांना बोलवून आणतात; कारण त्यांची खात्री होते की  मूल बहिरे आहे. नंतर डॉक्टरांनी दाखवल्यावर त्यांना कळतं की खुळखुळाच रिकामा असतो, बाळाच्या ऐकण्यात काहीही दोष नसतो .
एकाच बाजूने विचार करत राहिलो, एकच समजूत मनात घट्ट धरून राहिलो, की निष्कर्ष असे दिशाभूल करणारे निष्कर्ष निघतात  .
मजा आली😊😊...
स्वसंवाद ही एक secure फेज असते, विशुद्ध सुद्धा; परिपूर्णतेच्या दृष्टीने तिचा success rate ही जास्त असतो. त्यातला drawback असा, की स्वतःचा कसलाच say न ठेवता निखळ ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते, जी इतरांशी संवाद साधण्यासाठी फार आवश्यक असते.
 पर-संवादासाठी थोडं ढोबळ असावं लागतं; (दागिना बनवताना शुद्ध सोन्यात थोडी भेसळ करतात तसं काहीतरी...)
तंतोतंत wavelength जुळणं किंवा 100% आकलन शक्य नसतं...Input च्या तुलनेत output कमी असतो; त्या अर्थाने संवादाचा success rate कमी असतो. संवाद हा समजण्याचे, समजून घेण्याचे तुकडे जोडतच सुरू ठेवावा लागतो ...पण त्याचं उत्तर स्वसंवाद आहे असं वाटत नाही . पर-संवाद असावा, तो व्यक्तीगणिक qualitatively आणि quantitatively बदलत असला तरीही ..
कारण इतरांशी संवाद साधण्यात मजा आहे, ते आव्हानात्मकही आहे  आणि त्याहून जास्त liberating आहे!
(अजून एक, आपण बऱ्याचदा संवाद म्हणतो, तेव्हा आपल्याला कधी कधी फक्त श्रोता हवा असतो; आणि भूमिकांची अदलाबदल करण्याची संधी समोरच्याला मिळाली नाही की तो थकतो, कंटाळतो...😊...बॅटिंगचा टर्न फिरत राहिला पाहिजे, सगळेच चांगले बॅट्समन नसले तरी 😊 )



उलटी गंगा


व्यावसायिक क्षेत्रात unlearning या संकल्पनेला खूप महत्व आले आहे.
शिक्षण, व्यावसायिक अनुभव यांतून आपण काही बिझनेस मॉडेल्स, व्यावसायिक धोरणे आत्मसात करतो. पण काळाच्या ओघात ही outdated होत जातात. अशावेळी हे जुने ठोकताळे विसरणे, जेणेकरून अद्ययावत असलेली नवी मॉडेल्स, नवी धोरणे अंगीकारता येतील... याला unlearning म्हणतात.
आपल्या वैयक्तिक आयुष्यात ही हे खूप उपयुक्त आहे.
वय वाढत जाते तसे आपल्याला आलेल्या सगळ्या अनुभवांची डोक्यात एक archive बनते ,..जणू एक मोठ्ठा संदर्भग्रंथच तयार होतो.
वर्तमानात घडणारी प्रत्येक घटना अनुभवताना पूर्वीचे हे संदर्भ डोक्यात गर्दी करू लागतात; आणि बहुतांश वेळा हे निगेटिव्ह संदर्भ असतात.
उदा:आपल्या घरात एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाला, की आपल्याला त्या त्रासामुळे झालेले मृत्यू आठवतात; बरे झालेले रुग्ण नाही. कारण सगळ्या सुरळीत, व्यवस्थित घडलेल्या गोष्टी आठवणीत राहत नाहीत; पण वेगळं, दुर्दैवी काही घडलेले मात्र जास्त memorable असते आणि स्मृतीत जास्त राहते .
या सततच्या बॅकग्राउंड रेफेरेन्सस मुळे आपली दृष्टी निर्लेप राहत नाही. आपल्या जगण्यावर पूर्वानुभवाची पुटं चढत जातात. नवीन अनुभव घेताना मागच्या आठवणी कटू असतील तर तो अनुभव नाकारणे, किंवा ते अशक्य असेल तर भीती, निराशा अशा नकारात्मक भावना घेऊन त्या प्रसंगाला सामोरं जाणे, अशा गोष्टी घडतात .
आणि क्वचित सुखद आठवणी असल्या की सद्य प्रसंगाची त्यांच्याशी तुलना करून आनंदाची प्रतवारी ठरवली जाते.
निखळ अशी अनुभूती अशक्य होऊन बसते.

व्यक्ती, परिस्थिती, जीवनशैली, सामाजिक आचरण, इतकेच काय चांगल्या-वाईटाच्या संकल्पना, यांत कालानुरूप बदल होत असतात; पण आपण भूतकाळातले चष्मे लावले की दृष्टी निकोप राहत नाही आणि हे बदल उमजत नाहीत, किंवा मनापासून स्वीकारले जात नाहीत ..
म्हणून थोडे unlearning करावे; निखळ मनाने अनुभवांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करावा.
डोळस नक्कीच असावे, पण पूर्वानुभवातून आलेले शहाणपण, हे वर्तमानातील अनुभूतीच्या मार्गातील अडसर ठरू नये .

व्यासांचे शिल्प

#मला_भावलेलेलं_पुस्तक

माझ्यासाठी महाभारत हा लहानपणापासून कुतूहलाचा विषय...त्याचा विशाल पट आणि मानवी मनोव्यापराचे असंख्य प्रकार मनाला सदैव भुरळ घालत आलेले ...
महाभारतावरची वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचणे आणि वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेणे अजूनही सुरू आहे. त्यात विशेष प्रभाव टाकणारी पुस्तके म्हणजे पर्व,युगांत, व्यासांचा वारसा; पण सगळ्यात आवडलेले या विषयावरचे पुस्तक म्हणजे नरहर कुरुंदकर यांचे 'व्यासांचे_शिल्प'.
त्यांनी वेळोवेळी महाभारतविषयक केलेल्या लिखाणाचा संग्रह म्हणजे हे पुस्तक .
हे पुस्तक वाचताना त्यांचा व्यासंग, त्यांच्या विचारांतील स्पष्टता आणि सुयोग्य दिशा पदोपदी जाणवते, तसेच अतिशय चपखल समिक्षा करण्याची त्यांची हतोटी ही लक्षात येते .
महाभारताचा विचार एका वेगळ्या चिकित्सक दृष्टीने आपण करू लागतो.

महाभारताच्या किंवा एकूण धार्मिक वाङ्मयाचा कसा विचार करावा याबद्दल ते लिहितात,
"भारतीय युद्धासाठी अठरा अक्षौहिणी सैन्य जमले होते, रामचंद्र विमानातून लंकेवरून अयोध्येला गेले, इ. माहितीचे स्वरूप थोडेसे काव्य, थोडी श्रद्धा, खूपशी अतिशयोक्ती, थोडेसे ऐतिहासिक सत्य, असे असते. सगळे धर्मवाङ्मय समजून घेताना आपण हे तारतम्य बाळगले पाहिजे".

पुस्तकातील महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीबद्दल माहिती आणि ती तयार करण्यामागचे कष्ट वाचून आपण स्तिमित होतो.

कुरूंदकरांचे ययाती बद्दलचे विवेचन आपल्या पारंपारिक समजुतींना धक्का देते.

 तसेच भीष्माबद्दल लिहिताना मांडलेली 'पापाच्या बाजूने उभे असलेले पुण्य आणि पुण्याच्या बाजूने उभे असलेले पाप,'  ही संकल्पना ही विचारप्रवर्तक आहे.
"जगाच्या व्यवहारात आपण सज्जन असणे पुरेसे होत नाही; सज्जनाची बाजू घेऊन दुर्जनाविरुद्ध लढावेही लागते. हे ज्याला जमत नाही, त्याच्या सज्जनपणाचे मोल काय," असा परखड प्रश्नही ते उपस्थित करतात.याच अनुषंगाने ते आजही सार्वजनिक जीवनात बऱ्याचदा दिसणाऱ्या 'चांगल्या बाजूला वाईट माणसं आणि वाईट बाजूला चांगली माणसं,' या भेडसावणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष वेधतात.

मला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे त्यांनी केलेले श्रीकृष्णाचे वर्णन ... देवत्वाची सगळी पुटे बाजूला सारल्यानंतर ही एक अफाट कर्तृत्व असणारा लोकनेता, निष्णात योद्धा, मुत्सद्दी राजकारणी, असामान्य बुद्धिमत्ता असणारा किंगमेकर, एक आदर्श युगपुरुष म्हणून कृष्ण आपल्यासमोर येतो.
अतिशय मोठा लढवय्या असूनही तो हत्यार सोडून प्रसंगी रथाचे घोडे हाकणारा सारथी आहे, शस्त्रधारी असून शस्त्रत्याग करणारा ही आहे ; स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर साम्राज्ये उलथी-पालथी करणारा असूनही तो कोणत्याच साम्राज्याचा मोह न धरणारा आहे. तो जसा भोगविलासाचा प्रतिनिधी आहे, तसा सर्व अनासक्ती, वैराग्य आणि संयम यांचाही प्रतिनिधी आहे...
सामान्य गोपालकांच्या समूहाचे एका बलाढ्य साम्राज्यात रूपांतर करणाऱ्या असामान्य ताकदीच्या कृष्णाने साम्राज्य बिनधोक केले. पण राज्य बिनधोक झाले, संपत्ती आणि भोगाची साधने खूप झाली आणि कुणाचीच भीती राहिली नाही, की लोक बेजबाबदार होतात, आणि आपापसांतच मारामाऱ्या सुरू होतात; हा अटळ ऱ्हास तो श्रीकृष्ण ही टाळू शकला नाही, हे ही सांगायला कुरुंदकर विसरत नाहीत...
तसेच सत्यभामा, रुक्मिणी आणि राधा या व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून श्रीकृष्णचारित्राने प्रेम या कल्पनेची जी विविध रूपे मांडली आहेत, ती त्यांनी अतिशय सुंदरपणे उलगडून दाखवली आहेत.
त्यांचे इरावती कर्वे आणि प्रो. दामोदर कोसंबी यांच्यावर लिहिलेले लेख ही खूप माहितीपूर्ण आहेत.
पुस्तकात महाभारतावरचा वस्तुनिष्ठ, अभ्यासपूर्वक विचार तर आपल्याला दिसतोच, पण एकूणच धार्मिक वाङ्मयाचे वाचन करताना विचारांची बैठक कशी असावी याचे ही मार्गदर्शन नकळत आपल्याला मिळत राहते..

श्रीकृष्ण म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा कोलाज वाटतो...
हसरा, खोडकर, लडिवाळ बालक; वेडावणारा, भूल पाडणारा, लोभस नवतरुण; दुष्ट कंसाचा नायनाट करणारा  धाडसी युवक; पांडवांना मदत करणारा, सल्ला देणारा सुजाण मार्गदर्शक; वाटाघाटी करणारा धोरणी मुत्सद्दी; गीतेसारखं अजरामर ज्ञान देणारा तत्त्ववेत्ता...
असंख्य रूपे असणारा असा हा पूर्णपुरुष कृष्ण...
पण त्याचं सगळ्यात भावणारं रूप म्हणजे मित्राचं...
स्वतःच्या मोठेपणाचे ओझे नं होऊ देता तो मित्रत्वाचे, बरोबरीचे नातं निर्माण करतो. त्याच्यासमोर दडपण न येता सगळं मनातलं सांगता येतं, त्याच्यावर चिडता येतं, चिडवून घेता येतं ...
प्रत्येकाला हा फक्त आपलाच जिवलग आहे असा विश्वास देणारा जिवाभावाचा मित्र.
 ...राधेचा, गोपिकांचा, सुदाम्याचा, पांडवांचा, आणि कृष्णेचाही  ... #सखा ...

सार्थ- नावे आणि गावे


'सार्थ' नावाची एस. एल. भैरप्पांची एक कादंबरी आहे. यात कथानायक एका सार्थ(तांडा) सोबत मध्य भारतातील त्याच्या गावाकडून उत्तरेकडे प्रवासाला निघतो आणि अनेक अकल्पित वळणे घेऊन त्याचा प्रवास आणि तो, दोन्ही एका टप्प्यावर येऊन स्थिरावतात, असे साधारण कथानक आहे.

 ही कथा आठव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर घडते. त्या अनुषंगाने तात्कालिक भारतातील स्थित्यंतरे, विचारप्रवाह, राजकारण, समाजजीवन, रूढी आणि धार्मिक आचार-विचार यांचे खूप समर्पक आणि अभ्यासू चित्रण कादंबरीत आहे .
कथेत काही ऐतिहासिक व्यक्तिरेखांचाही समावेश आहे. तसेच त्या काळातील मुख्य प्रवासमार्गांचे वर्णन असून बऱ्याच खऱ्या नगरांचा उल्लेख आहे, ज्यांची नावे मात्र त्या काळात प्रचलित असलेली आहेत.

 त्या गावांची आजची नावे शोधायला मजा आली.

माहिष्मती: मध्य भारतातील एका छोट्या राज्याची राजधानी . आताचे महेश्वर (म.प्र).
उज्जयनी : मध्य भारतातील एक महत्वाचे राजधानीचे शहर. आजचे उज्जैन .
प्रतिष्ठान: सातवाहनांची राजधानी. आताचे पैठण .
पाटलीपुत्र: प्राचीन भारतातील एक अतिशय महत्वाचे शहर; मौर्य, गुप्त साम्राज्यांची राजधानी. आताचे पटना (बिहार).
कन्याकुब्ज: उत्तर भारतातील एक महत्वाचे राजनैतिक आणि व्यापारी केंद्र. आताचे कनोज (उ.प्र).
अहिछत्र: उत्तर पंचालची राजधानी . आताचे  अहीक्षेत्र, बरेली जवळ(उ.प्र)
कोसंबी: प्राचीन उत्तर भारतातील एक नगर. आताचे कौशंबी, अलाहाबाद जवळ(उ.प्र).
कांपिल्य: दक्षिण पंचालची राजधानी. आताचे कंपिल गाव.(उ.प्र).
ताम्रलिप्ती : बंगालच्या खाडीजवळ असलेले प्राचीन भारतातील एक महत्वाचे बंदर व व्यापारी केंद्र. आताचे तामलुक (पश्चिम बंगाल).
तक्षशिला: प्राचीन वायव्य भारतातील एक महत्वाचे शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यापारी केंद्र. आताचे तक्सीला , रावळपिंडीजवळ (पाकिस्तान).
पुष्कलावती: प्राचीन गांधार राज्याची राजधानी.
आजचे चारसद्दा, पेशावरजवळ (पाकिस्तान).
मूलस्थान: प्राचीन वायव्य भारतातील सुर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असणारे एक नगर.
आताचे मुलतान, पंजाब (पाकिस्तान).
सिंहल देश: श्रीलंका.
सुवर्णद्वीप: सुमात्रा.

काही गावांचा मात्र शोध लागला नाही :
घरकच्छ (मध्य भारत).
रोहितगिरी (उत्तर भारत).
त्रिविष्णू प्रदेश (उत्तर भारत).

नव-कलेवर


साधारण एका वर्षांपूर्वी नवकलेवर या संकल्पनेची ओळख झाली... इरावती कर्वेनी हे रूपक वापरून जो विचार मांडला तो ही खूप प्रभावित करून गेला. दोन तीन दिवसांपूर्वी परत एका कवितेच्या निमित्ताने नवकलेवर आठवले....
हिंदूंच्या चार धामांपैकी एक असलेले पुरीचे जगन्नाथ मंदिर. अनेक आख्यायिका आणि कथांची पार्श्वभूमी असणारे. इथली रथयात्रा प्रसिद्ध आहे.
अजून एका अलौकिक गोष्टीसाठी हे मंदिर ओळखले जाते, ती म्हणजे दर 12 किंवा 19 वर्षांनी होणारा नवकलेवर विधी.
हिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्या वर्षी जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या नवीन काष्ठमूर्ती तयार करून त्यांची शास्त्रोक्त विधीवत प्रतिष्ठापना करणे म्हणजेच ‘नव-कलेवर’.
जेव्हा अधिक आषाढ महिना येतो तेव्हाच नवीन मूर्ती घडवून जुन्या मूर्ती बदलतात.
या प्रथेचा नेमका उगम ज्ञात नाही, पण  अशी प्रथा पडण्यामागे काही व्यवहारिक आणि काही तात्कालिक कारणं असावीत.
मूर्ती लाकडी आहेत, विशिष्ट काळानंतर खराब होतात, म्हणून त्या बदलणे गरजेचे .
दुसरे म्हणजे मध्ययुगात परकीय आक्रमण काळात मूर्ती लपवल्या गेल्या, प्रसंगी मातीखाली पुरल्या गेल्या, आणि आक्रमण ओसरल्यावर जेव्हा बाहेर काढला गेल्या तेव्हा  बऱ्याच खराब झाल्या होत्या. मग त्या बदलल्या गेल्या. असे काही वेळा झाल्यावर  तो एक नियमित उपक्रमच बनला असावा.
हिंदू धर्मातल्या प्राणप्रतिष्ठा आणि अमर आत्मा या दोन संकल्पना इथे फार महत्वाच्या आहेत. त्यानुसार या सोहळ्यात आधी नवीन मूर्ती घडवल्या जातात; आणि जुन्या मूर्तींतले प्राण किंवा ब्रह्मतत्व काढून नवीन मूर्तींमध्ये टाकण्याचा विधी होतो. ही प्राणप्रतिष्ठा झाली की नवीन मूर्ती पूजण्यायोग्य होतात, आणि जुन्या मूर्ती मंदिराच्या प्रांगणात असणाऱ्या कोइली वैकुंठ येथे पुरल्या जातात.
पुरीच्या मंदिरात जगन्नाथाची दिनचर्या मनुष्यासारखी आहे. देव दात घासतो, अंघोळ करतो, वेगवेगळे वस्त्र परिधान करतो, जेवण करतो, आणि कधी कधी चक्क आजारीही पडतो. मनुष्यासारखाच त्याचा मृत्यूसुद्धा होतो.
पण आत्मा अमर, अक्षय असतो. जुन्या जीर्ण शरीराचा त्याग करून तो एक नवीन शरीर धारण करतो. 
पुरीतला हा जगन्नाथ जन्म-मरणाचे देवालाही न चुकलेले अटळ वर्तुळ आणि आत्म्याचे अमरत्व सोदाहरण दाखवत युगानुयुगे उभा आहे.
हा सगळा सोहळा फार विस्तृत आहे आणि खूप काटेकोरपणे तपशीलवार पार पाडला जातो. आजच्या विज्ञायुगात हे सगळे अंधश्रद्धा म्हणून झटकून देऊ शकतो , पण त्याचवेळी इतका मोठा धार्मिक कार्यक्रम आणि त्यात गुंतलेल्या असंख्य लोकांच्या अढळ श्रद्धा पाहिल्या की स्तिमित व्हायला होतं.
नवकलेवर विधी असो, कुंभ मेळा असो, आपली वारी असो, की वेगवेगळ्या तीर्थयात्रा असो, असे सामूहिक कार्यक्रम माणसांना श्रद्धेच्या धाग्याने जोडतात आणि त्या एका देव नावाच्या तत्वाशीच नव्हे, तर त्याचे भक्त म्हणून इतर माणसांशीही तादात्म्य पावायला, स्वतःला त्यांच्याशी जोडून घ्यायला मदत करतात.
माणसाचे सामाजिक प्राणी म्हणून असणारी ओळख आणि भान या अशा प्रथांमुळे  सुदृढ होत असावे .
कुठल्याही कारणाने मनुष्यसमूह एकत्र आला की अनेक विधी आणि प्रोटोकॉल निर्माण होतात.
देश, संस्था, पक्ष ही कारणं असली की त्यांना देशभक्ती, आचारसंहिता, पक्षशिस्त अशी नावं मिळतात आणि ती मनाला आणि बुद्धीलाही सहज मान्य होतात.
पण धार्मिक कारणाने होणाऱ्या विधींना मात्र अर्थहीन कर्मकांड मानले जाते आणि आपली पहिली प्रतिक्रिया अविश्वासाची असते.
बुद्धीच्या मर्यादेपल्याड असणारे असे श्रद्धेचे, भावपूर्ण सोहळे पाहिले की मात्र मन  संभ्रमित होतं; इंद्रियगम्य ज्ञानापलीकडे असलेल्या गोष्टींवर भावनिक होऊन डोळे झाकून विश्वास ठेवणं बुद्धीला जड जातं, आणि नुसत्या बुद्धीची कास पकडून राहायचं तर भावनारहित जगण्याचा कोरडेपणा जाणवतो....




ऐक ना जरा

माणसाला जे दिसतं, जाणवतं, समजतं;  त्याच्या मनात ज्या भावना, विचार येतात;.... इतकंच नव्हे, तर तो जे कल्पनेत रंगवतो,  ते सगळं त्याला आपल्यासारख्या कुणापर्यंत तरी पोहोचवायचं असतं. या अभिव्यक्तीचा उर्मीतूनच भाषेसारखी संपर्कसाधने परिष्कृत होत जातात.
 साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, चलचित्र, असे अनेक कलाविष्कारही यातूनच जन्माला आले असावेत. आज सोशल मीडिया इतका लोकप्रिय आहे त्याच्या मुळाशीही हीच उर्मी आहे .
आपली जी भावनिक गुंतवणूक किंवा अवलंबित्व असते, तिचा गाभासुद्धा संवादाची गरज आणि तिची पूर्ती, याने व्यापलेला असतो. आणि गंमत म्हणजे आपण संवाद म्हणत असलो तरी आपल्याला मूलतः श्रोता, recepient हवा असतो...
माणसाचे आयुष्य म्हणजे अशा समानशील श्रोत्यांच्या शोधाचा प्रवास  असावा....




गोष्टी छोट्या... डोंगराएवढ्या

'द हॉबिट' या चित्रत्रयीतल्या तिसऱ्या चित्रपटात एक फार सुंदर सीन आहे.
थोरिन हा राजा त्याच्या वाडवडिलांचे गमावलेले पर्वतावरचे राज्य परत मिळवतो, आणि त्या पर्वतात असलेल्या प्रचंड संपत्तीचा मालक होतो. ते अपरंपार सोने बघून सगळी तत्व, उमदेपणा विसरतो आणि जवळजवळ वेडाच्या पातळीपर्यंत मोह त्याला झपाटतो. इतक्या प्रचंड संपत्तीचा मालक होऊनही तो अशांत असतो कारण अर्केंस्टोन नावाचे एक खूप मौल्यवान रत्न त्याला सापडत नसते. तो स्वतःच्या निष्ठावान साथीदारांवर संशय घेऊ लागतो. बिल्बो या विश्वासू सवंगड्यालाही तो संशयापोटी  मुठीत काय आहे हे विचारतो तेव्हा बिल्बो आपली मूठ उघडून त्याला प्रवासात मिळालेल्या आणि जतन करून ठेवलेल्या दोन बिया दाखवतो आणि सांगतो की त्याने त्या बिया घरी नेण्यासाठी जपून ठेवल्या आहेत. थोरिन त्याला हसून विचारतो इतकी क्षुल्लक वस्तू तो परत घरापर्यंत का सांभाळून नेतोय .
त्यावर बिल्बो म्हणतो त्या बिया मी स्वतःच्या घरी नेऊन माझ्या अंगणात पेरणार, त्यांचे वृक्ष होणार आणि त्यांच्याकडे पाहून मला चांगला-वाईट गोष्टींनी भरलेला हा सगळा प्रवास आठवणार; आणि हा सगळा रोमहर्षक प्रवास पार पाडून मी सुखरूप घरी परत येऊ शकलो ही किती मोठी सुदैवाची गोष्ट आहे, हे माझ्या स्मरणात कायम राहणार...
त्यावर एखादी महत्वाची पण विस्मरणात गेलेली गोष्ट लक्षात आल्यासारखं एक खूप सुरेख, निखळ हास्य थोरिनच्या चेहऱ्यावर उमलतं, त्याचा चेहरा परत आधीच्या थोरिनसारखा दिसायला लागतो आणि क्षणभर आपल्यालाही वाटतं त्याचा सुवर्ण ज्वर आता उतरला...

आयुष्य फार मजेशीर आहे ...आपल्या सुखाच्या कल्पना वाढल्या की दुःख वाढत जातं 😊... जे मिळालं ते गृहीत धरल्या जातं आणि अजून काहीतरी मिळवण्याची धडपड सुरू राहते . साधने आपल्यासाठी की आपण साधनांसाठी हेच कळेनासं होतं...
 साध्या सोप्या दैनंदिन बेसिक गोष्टींत आनंद मानणारा बिल्बो सगळ्यांच्या मनात असतो. पण कधीकधी आपणच अंगावर घेतलेल्या अनावश्यक ओझ्यांखाली पार गुदमरून जातो... त्याला जागृत आणि सक्रिय ठेऊ शकलो तर आयुष्य इतकंही कठीण नाही...😊

वाचनालय नावाचे ओऍसिस

वाचनालय या अलिबाबाच्या गुहेशी माझी ओळख फार लहानपणी झाली. आजोबांचे एक मित्र ग्रंथपाल होते आणि त्यांना भेटायला जाताना ते मला सोबत घेऊन जायचे. त्यांच्या गप्पा होईपर्यंत मी तिथल्या बालविभागात हरवून जायचे.
साधारण आठवीत असताना 'वाचनालय' या अलीबाबाच्या गुहेची चावी मिळाली. शाळेच्या रस्त्यावर असलेल्या वाचनालयाची सदस्य झाले. तिथल्या ग्रंथपाल 'कोरा कागज'मधल्या जया भादुरीसारख्या दिसायच्या, तशीच वेणी आणि चष्मा. त्यांची सेन्सॉरशिप मात्र जबर असायची;  वि. स.  खांडेकर चालायचे, ना. सी. फडके नॉट अलाउड 😊. इंडिया टुडे, ज्युनियर सायन्स रिफ्रेशर सारखी मासिके मिळायची, गृहशोभिका, फिल्मफेअरला मज्जाव होता .
पण चांगली पुस्तकं सजेस्ट करायच्या, आवर्जून वाचायला द्यायच्या. फार भरभर पुस्तकं बदलायला गेले की अभ्यासपण करत जा अशी तंबी मिळायची.
अकरावी बारावीला मात्र PCB चा विळखा पडला,आणि मग त्याने थेट औरंगाबादला रवानगी केली, आणि गावातली लायब्ररी सुटलीच.
औरंगाबादला परत कॉलेजजवळ असलेले एक वाचनालय लावले, तेही आम्ही चार - पाच मैत्रिणींनी मिळून... शॉपिंगला मुली मिळून जातात तसं मिळून लायब्ररीत जायचो. व पु आणि गौरी देशपांडे जास्त वाचायचो तेव्हा, आणि खूप वादविवादही करायचो.
एकीकडे स्त्रीवादी लिखाण वाचत होतो, (त्यातले काही चांगलेच जहाल होते) आणि त्याचा विचारांवर परिणाम होत होता; त्याचवेळी दुसरीकडे पडद्यावरचे (आणि काही स्थानिकदेखील) शाहरुख, आमिर खुणावत होते ...😊
पण शेवटी हृदय आणि बुद्धी यात बुद्धीचा विजय झाला. आणि चेहरे पढण्याची यातायात वाचवून आम्ही सगळ्या सुखाने किताबें पढत राहिलो 😊.
मग लग्न झालं, आणि होस्टेलमध्ये राहून  पोस्टग्रॅज्युएशन आणि संसार एकत्रच सुरू झाला.
खरा संसार मात्र पीजी संपल्यानंतर सुरू झाला. पिठाची गिरणी कुठे, किराणा दुकान कुठे, या चौकशीत वाचनालय कुठे ही चौकशी सामील होती. घराजवळच एक छोटं वाचनालय सापडलं आणि माहेर मिळाल्यासारखं झालं... लगेच मेम्बर झाले. 
तिथे काही पुस्तकं टेबलावर ट्रेज मध्ये मांडून ठेवलेली असायची, त्यातून निवडणं अपेक्षित असायचं. बाजूच्या एका रूममध्ये  रॅक्समध्ये आणि काचेच्या कुलूपबंद कपाटांमधून पुस्तकं ठेवलेली होती.
मला सहज समोर असलेल्या पुस्तकांमधली आवडायची नाहीत, आणि कुलुपं उघडून त्यातून पुस्तकं काढून द्यायचा लायब्रेरियन काकांना कंटाळा यायचा . पण हळूहळू पाषाणाला पाझर फुटला आणि हवी ती पुस्तकं काका देऊ लागले. नंतर तर आमची चांगली गट्टी झाली आणि वाचनालयाच्या वार्षिक खरेदीच्या वेळी ते माझी यादीही घ्यायला लागले. खूप सारी अनुवादित पुस्तकं वाचली त्या काळात .
अजून एक गंमत होती, लायब्ररीत पुस्तक घेतानाची माझी वेगळी सही होती, अगदी पहिल्यापासून.. ती सही मी दुसरीकडे कुठेच करायचे नाही...

मग घर बदललं... दोनेक वर्ष खूप प्रयत्नपूर्वक लायब्ररीसोबतची लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप निभावली, पण नंतर कठीण व्हायला लागलं . महिना महिना पुस्तक बदलायला जाणेच व्हायचे नाही. तरी सदस्यत्व रद्द करवत नव्हतं. पण शेवटी लक्षात आलं, हे कन्टीन्यू करणं शक्य नाही.
शेवटी मेम्बरशिप बंद करायचं ठरवलं...नाही म्हटलं तरी शेवटच्या सह्या करताना डोळ्यासमोर सगळं धूसर धूसर झालं ...एखादी सख्खी मैत्रीण कायमची सोडून जातीय असं काहीतरी वाटायला लागलं .
आता इकडे फार आवडेल अशी दुसरी लायब्ररी नाही, वाचनही मोजकं झालं आहे..
आणि आता हळूहळू ती सहीही कायमची हरवून जाणार, असे वाटू लागले आहे..
  

लग्नाला जातो...

#The_big_fat_Indian_Wedding

या सीजनमध्ये अटेंड केलेल्या लग्न समारंभांमध्ये काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या :
● लग्न-सोहळा पूर्ण होईपर्यंत आपल्याला वधू (क्वचित वधुमाता)आणि वर यांच्या पेहरावाचे बजट, त्याची थीम, तसेच आपण जेवणार असलेल्या/ जेवत असलेल्या ताटाचा दर, या  गोष्टींची अचूक माहिती हमखास मिळते.
● सगळ्या नवतरुणी लेटेस्ट ट्रेण्डनुसार सजलेल्या असतात आणि खूप क्युट आणि एकसारख्या दिसत असतात .
● सगळ्या चिरतरुण महिलांनी यथोचित आवरलेलं असतं, तरी मोबाईल कॅमेराचा सेल्फी मोड ऑन करून खातरजमा करणं सुरू असतं.
(गम्मत म्हणजे शक्यतो कुणी कुणाला छान म्हणत नाही; कुणी कॉम्प्लिमेंट दिली तरी तिच्याकडे संशयाने पाहिलं जातं.)
● नेहमीच्या पोशाखात असलेली थोडी कमी, तर ट्रेडिशनल वेअर घालावे लागलेली थोडी जास्त, अशा अवघडलेपणाच्या विविध स्थितींत असलेली पुरुष मंडळी इस्ततः विखुरलेली असतात.
त्यात लग्न ताजे असलेले काही बिचारे जोडीने सेल्फी घेण्याच्या किंवा बेटर हाफचे निरनिराळ्या पोझमधले फोटो काढण्याच्या ड्युटीवर तैनात असतात.
● दोन्हीकडच्या जवळच्या नातेवाईकांनी कपडे आणि ऍक्सेसरीजवर बराच खर्च केलेला असतो, आणि तो वसूल व्हावा या उद्देशाने त्यांनी स्टेजवर गर्दी केलेली असते; यामुळे सामान्य जनतेला स्टेजवरचे विधी, समारंभ अजिबात दिसत नाहीत.
● हे सगळं किरकोळ आहे, असे वाटायला लावणारा लाखो रुपये खर्चून बनवलेला प्री-वेडिंग व्हिडीओ साईड स्क्रीनवर सुरू असतो, दुर्दैवाने काही लग्नाळू मेम्बर सोडले तर त्याकडेही फारसे कुणाचे लक्ष नसते.
● जेवणाचे खूप सारे काउंटर्स असतात आणि खूप मोठी रांगही; आणि कितीही डोळ्यात तेल घालून पदार्थ घेतले तरी  शेजारच्या प्लेटमध्ये वेगळे काहीतरी दिसते आणि उगीच चुटपुट लागून राहते.
● आहेर नको असे पत्रिकेत लिहिलेले असले तरी बऱ्याच जणांनी पुष्पगुच्छ आणलेले असतात, त्यांचा एक छोटासा केविलवाणा ढिगारा स्टेजच्या एका कोपऱ्यात तयार झालेला असतो.(त्यात निशिगंध असेल, आणि संध्याकाळचे लग्न असेल तर मात्र मस्त सुगंधी वातावरण तयार होते)

एकूणात 'conspicuous consumption', ही संकल्पना वेगळ्या अर्थाने, पण सोदाहरण स्पष्ट होते 😊.







आपण खरंच सहिष्णू आहोत?

मी पहिल्यांदा पुण्यात राहिले ते दहावीच्या सुट्टीत, NTSE परीक्षेच्या दुसऱ्या फेरीचे क्लासेस करण्यासाठी; त्यावेळी लातूर जिल्ह्यात अशी सोय कुठे नव्हती, किंबहुना ही परीक्षाच फारशी कुणाला माहीत नव्हती.
आपल्या ठराविक सुरक्षित परिघाबाहेर जाऊन राहण्याची ही पहिलीच वेळ. बाहेरच्या जगाचा फारसा अंदाज नव्हता, आणि इथे मात्र पूर्ण वेगळं असं जग समोर होतं.
मला पुणं माहीत आहे म्हणजे पुण्यातल्यांनाही माझं गाव माहीत असेल हा भ्रम लगेच दूर झाला...उदगीर? कर्नाटकात आहे का? विदर्भ का?  असे प्रश्न ऐकले की विचित्र वाटायचं.. मग मी लातूर सांगायला लागले(अजूनही लातूरच सांगितलं जातं). त्यानेही किरकोळच फरक पडला.
भाषेच्या बाबतीतही असंच व्हायचं; बोलण्यात तो एक विशिष्ट हेल यायचा,(अजूनही येतो थोडा, पण आता कुणी तोंडावर हसत नाही..) आणि कुणी पुसटसं हसलं तरी बोलण्याचा कॉन्फिडन्स जायचा. तसं फार कुणी बोलायचंही नाही, आपण बोलायला गेलो तरी प्रतिसाद थंड असायचा, hostility जाणवायची.
  वर्गाला जायचं म्हणजे संकट वाटू लागलं. सगळे स्मार्ट, कॉन्फिडन्ट, स्टायलिश कपडे घालणारे, कॉन्व्हेंटची इंग्लिश आणि पुणेरी मराठी बोलणारे; त्या सगळ्यात आपण फार गावंढळ आहोत असं वाटायचं.
मागासलेल्या भागातून आलेलं असणं म्हणजे नेमकं काय असतं याची जाणीव झाली.
मग एक quiz झाला वर्गात.. पाहिल्या दोन तीन प्रश्नांची उत्तरे येत असून मी संकोचामुळे दिली नाहीत. नंतर मात्र हिम्मत करून बोलायला सुरुवात केली आणि बरीचशी अचूक उत्तरे दिली. गंमत अशी झाली होती की quiz सोशल सायन्सेस वर होता, आणि ही मुलं विज्ञानात सराईत असली तरी इतिहास भूगोलकडे कमी लक्ष देणारी होती.
विज्ञान, गणित महत्वाचं म्हणून फक्त त्यावर फोकस करायचं आणि सोशल सायन्स, भाषा विषय थोडं दुर्लक्षित केलं तरी चालेल, असा भेदभाव करणारी स्मार्ट शाळा नव्हती आमची.  त्यात गणित, विज्ञान यापेक्षा इतिहास, भूगोल, भाषा, हे विषय माझ्या कणभर जास्त आवडीचे, त्यामुळे त्या विषयात थोडी गती होती. त्या दिवसापासून बाकी विद्यार्थ्यांचा अप्रोच थोडा बदलला. काहीजण तरी ओळख दाखवू लागले, बोलू लागले.

पण पुढेही हे कायम जाणवत राहिलं की आपण सहिष्णू आणि समावेशक नाही आहोत.
बऱ्याचदा आपल्यापेक्षा वेगळं काही समोर आलं की आपली पहिली प्रतिक्रिया तुच्छतेची आणि उदासीनतेची असते; आपण सहज स्वीकार करतच नाही .
साधं घरातदेखील सासूला सुनेच्या माहेरच्या रूढी चूक वाटतात, सुनेला मात्र त्यांचा जाज्वल्य अभिमान... 'आमच्याकडे असं नव्हतं', आणि 'आपल्याकडे हे असलं काही चालत नाही', यात कितीतरी वर्ष वाया जातात.
शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांना सिनेसंगीत फालतू वाटतं, सिनेसंगीत प्रेमींना शास्त्रीय संगीत बिनकामाचं पाल्हाळीक वाटतं. इंग्रजी साहित्य वाचणाऱ्यांना मराठीतलं लिखाण तुच्छ वाटतं. आधुनिक वेशभूषा आवडणाऱ्यांना पारंपरिक कपडे घालणारे गबाळे  वाटतात; उलटपक्षी यांना ते छिचोर वाटतात.... यादी न संपणारी आहे.
एखादी गोष्ट आपल्या मान्यतांपेक्षा चांगली किंवा वाईट आहे, असे मूल्यन न करता फक्त वेगळी आहे, अशी भूमिका ठेवणं आणि त्याबद्दल जजमेंटल न होणं आपल्याला इतकं का जड व्हावं ...



तीळ गुळ घ्या...

आजच्या दिवशी "गोड गोड बोला" हे सहज, फार विचार न करता औपचारिकता म्हणून म्हटले जाणारे शब्द.
 जन्मानंतर भोवतालच्या माणसांशी व्यक्तीचा पहिला स्पष्ट संपर्क घडतो तो गोड बोबड्या बोलांतून. आणि तिथून आयुष्यभर वापरात येणाऱ्या भाषा नावाच्या सनातन संपर्क माध्यमाचे त्याचे शिक्षण सुरू होते.
भाषेच्या माध्यमातून आपल्याच नव्हे तर आपल्या मागील पिढ्यांच्याही अनुभवांचे संचित आपल्या प्रजातीच्या इतर सदस्यांना हस्तांतरित करता येत असल्यामुळे  मनुष्याची शहाणीव तो प्रत्यक्ष जगत असलेल्या आयुष्यापेक्षा जास्त असते, आणि पिढी दर पिढी हा संग्रह वाढत जातो.
या सगळ्या इनपुट्स मुळे मनात उमटणाऱ्या  विचारांची, भावनांची देवाण घेवाण करणे, संवाद साधणे, हे बोलणे या क्रियेमागचा मुख्य उद्देश्य.
पण सगळ्यात विपुल प्रमाणात वापरले जाणारे आणि जवळजवळ प्रत्येकाला ज्ञात असलेले हे माध्यम फारसा विचार न करता वापरले जाते. स्वस्ताई असली की वापर बेबंद होतो😊.
आपल्या हाताशी असणाऱ्या साधनाचे शस्त्र कधी होते कळत नाही आणि एकदा हे सुरू झाले की बोलण्याचा प्राथमिक उपयोग बाजूला पडतो.
अशा स्थितीत आजच्या मुहूर्तावरचे "गोड बोला" हे रिमाइंडर... गोड बोलणे म्हणजे फक्त तोंड देखलेपणा किंवा खोटी स्तुती नव्हे; त्यात मृदू बोलणे,  निर्विष बोलणे, विचार किंवा मत व्यक्त करताना अनावश्यक विखार टाळणे, हेही समाविष्ट असावे.. असे हे संक्रमण तुम्हा-आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात होवो ...🙂

" बोली एक अनमोल है, जो कोई बोलै जानि।
 हिये तराजू तौलि के, तब मुख बाहर आनि।। "
-- कबीर


समाजमाध्यमांची शमा

समाजमाध्यमे आणि त्यांचे योगदान .

सध्या एखादी गोष्ट लोकप्रिय झाली, की काहीजण आपले वेगळेपण दाखवण्यासाठी लगेच विरोध दर्शवू लागतात. फेसबुक आणि व्हाट्सअप्प विद्यापीठे समाजात जनजागृती आणि सामंजस्य पसरवण्याचे अतिशय थोर कार्य करत असताना असा अस्थायी विरोध करणे खरे तर त्यांच्या ज्ञानद्रोहाचाच पुरावा, पण म्हणतात ना, 'जया अंगी मोठेपण...' असो.
तर आता आपण थोडक्यात फेसबुक आणि व्हाट्सअप्प चे प्रमुख फायदे पाहूया.
१. कुठल्याही रांगेत उभे असतानाचा वेळ खरे तर प्रचंड वैताग येण्याचा, पण फेबु, व्हाऍ मुळे हा प्रतिक्षाकाळ सुसह्य होतो, लोकांचा उद्रेक होत नाही, शांतता राखली जाते.
दुसरे म्हणजे फोन हातात घेतलेला असल्यामुळे आपल्या आणि आपल्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीत पुरेसे अंतर राखले जाऊन सांस्कृतिक गरिमा राखली जाते.
२. स्मार्टफोनमुळे सगळे सगळ्या बाबतींत स्मार्ट बनतात. आधी फक्त सालगड्याचा यंदा काय रेट हाय, किंवा बोनस मिळणार का, या विवंचनेत असणारे आता राफेल च्या किमतींबद्दल सांगू शकतात, किती टेर्रिस्ट उडवले याचीही अचूक माहिती देतात. पोरांना डब्यात काय देऊ, कामवाल्या बायका लै त्रास देतात आजकाल, अशा क्षुल्लक बाबींमध्ये अडकलेल्या भगिनी आता सगळ्या देशी विदेशी रेशीपींबद्दल बोलू शकतात, इतकंच काय कॅलरी ते तैमुर कशावर पण बोलू शकतात.(फक्त " आमच्या यांना काही कळत नाही", या शाश्वत सत्यात काही बदल झालेला नाहीय)
३. समाजमाध्यमांमध्ये लिहून 'शांती में क्रांती'  नावाची अहिंसक, सुलभ, हानीरहित चळवळ बसल्याजागी सुरू करून पूर्णत्वास नेता येते. अशा चळवल्या महात्म्यास कुठलीही तोशीस न लागता क्रांतिवीर झाल्याचे, तर ते वाचणाऱ्याला, टिप्पणी करणाऱ्याला, शेअर तसेच फॉरवर्ड करणाऱ्याला क्रांतीपालखीचे भोई झाले असल्याचे समाधान लाभते .
समाजात खरी क्रांती होण्याइतका उद्रेक साठत नाही हा समाजस्वास्थ्यासाठी वाढीव लाभ आहेच ..
४. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे या उच्च विचाराने प्रेरित होऊन फेबु व्हाऍ वर सर्व प्रकारच्या माहितीची आणि चित्रफितींची अविरत देवाणघेवाण होत असते. याचा दुसरा लाभ असा की जिओ सारख्या कुटीरुद्योगांना जीवदान मिळते.
५. लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य ही विद्यापीठे करतात.
'घर की मुर्गी' समस्येने ग्रस्त व्यक्तींना इथे कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतात. वाचवत नाही इतकं भंगार लिहिलंय, किती फिल्टर लावा कावळ्याचे कबुतर होत नसतंय, अशी क्रूर विधाने न करता वाचणारे पुष्पवृष्टी करतात, अंगठा, हृदय अर्पण करतात, इतकंच नाही तर खूप अभ्यासू लेख, अगदी माझ्या मनातलं, किती सुंदर, कुठल्या कॉलेजात जाता? अशी मधुर स्तुतीसुमनेही उधळतात आणि एकमेकांचा आत्मविश्वास वाढवत असतात.
६. फेबु व्हाऍ म्हणजे अनेकांच्या आयुष्यरूपी मरुस्थळातले आपुलकीचे मृगजळ, आय मीन मरुद्यान असते. प्रत्यक्ष आयुष्यात एखादीची छबी जास्त वेळ न्याहाळणे आणि त्यावर टिप्पणी करणे म्हणजे काय मेला फालतू लोचट माणूस आहे अशी पंचक्रोशीत दुष्कीर्ती करून घेणं;
इथे मात्र बिनधास्तपणे फूल, पत्री सॉरी सॉरी बदाम, हृदय बहाल करणारा हात,  असे काय काय अर्पण करता येते. बदल्यात अंगठा, बदाम मिळतो आणि अगदीच नशीब जोरात असेल तर ईश्श्य लबाड, असे लाडीक रिटर्न गिफ्टही मिळते. सगळीकडे द्वेषाचे वातावरण वरचढ होत असताना, साने गुरुजींचा जगाला प्रेम अर्पावे हा महान संदेश इथे सदैव दिला जात असतो.
७. नातेसंबंध आधीसारखे राहिले नाहीत, लोक स्वार्थी झाली, माणसं माणसांपेक्षा गॅजेट्स मध्ये रमली, गेले ते दिन गेले, ही कैफियत मांडण्यासाठी ही गॅजेट्सच उपयोगी येतात. फेबु व्हॅ ऍ वर वेळ घालवण्यापेक्षा स्त्रियांनी संसाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे, हा लाख मोलाचा संदेशही फेबु व्हा ऍ वर मिळतो, ही किती थोर गोष्ट आहे.

तसे अजून खूप मुद्दे आहेत, पण कसे आहे, माध्यम तारतम्याने वापरावे याबाबत मी फार दक्ष असते, उगीच फालतू वेळ घालवणे तत्वात बसतच नाही आपल्याला, फक्त आठवड्यात चार पाच डीपी आणि रोज दहा बारा फॉरवर्ड्स बास, याहून जास्त वेळ नसतोच, बिजी असते मी बरीच ...

 शेवटी काय हो, आपल्या वापरण्यावर असते सगळे; आता ते प.पू.आनंद बक्षी महाराज सांगून गेलेच आहेत..

"ये शमा तो जली रोशनी के लिए,
इस शमा से कहीं आग लग जाए तो,
 ये शमा क्या करे ?"

गॉन विथ द विंड



स्कार्लेट आणि ऱ्हेट..
अशा ज्वालाग्राही माणसांचं प्राक्तन अटळ असावं.. मिळमिळीत चाकोरीत रमणे यांना शक्य नसते आणि वादळी आयुष्य जगताना गर्तेत जाणं अटळ.
स्कार्लेट.. स्वतःच्या सौन्दर्याची पुरेपूर जाणीव असणारी, हट्टी, चौकटी न मानणारी बंडखोर अशी मुलगी.
स्कारलेट उत्कट प्रेम या संकल्पनेच्याच प्रेमात पडते आणि एक काल्पनिक प्रतिमा बनवून त्यात ऍशलेला बळेच एकतर्फी बसवते; त्याच्यात जे नाही तेही त्याच्यात बघते. तिचा आत्मविश्वास म्हणा, की अडमुठेपणा म्हणा, वास्तवात ऍशलेचे आपल्यावर प्रेम नाही हे न स्वीकारता ती तो आपल्याला कधी ना कधी मिळवू हा दुर्दम्य आशावाद बाळगत राहते, इतकेच नाही तर ते तिचे ऑब्सेशन बनते. तिला आपल्या दुराग्रहाचा पुनर्विचारही करावासा वाटत नाही.
मनोव्यापार फार गमतीचा असतो. एकदा खेळ मांडला, अगदी स्वतःच्या मनात जरी ; की जीव त्यात गुंतत जातो. वास्तवाचे भान सुटत जाते आणि खेळ मोडला आहे,संपला आहे, खेळातली आपली भूमिका संपली आहे, किंवा आपली भूमिकाच नाहीय याचा  स्वीकार मन करत नाही.
या मृगजळाच्या मागे धावण्याच्या नादात तिला जे खरोखर हवंय, अनुरूप आहे, ते प्रेम तिला दिसतच नाही. खऱ्या जिवलगाची ओळख पटते तोवर उशीर झालेला असतो.

आणि ऱ्हेट.. तो सद्गृहस्थ नाही, हळवा रोमँटिक नायक तर मुळीच नाही; एक धूर्त, स्वार्थी आणि खूप व्यवहारी इसम. पण तो पाखंडी किंवा ढोंगी नाही. खरंच सद्गुणी असणारी ऍशलेची पत्नी मेलिसा, तिच्याबद्दल त्याला ममत्व आणि आदर आहे.
स्कार्लेटचे बेदरकार वागणे, हवे ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणे, सामाजिक संकेतांबद्दल बेफिकीर असणे, या सगळ्यांशी तो relate करू शकतो. तिचा भ्रमही त्याला दिसतो, समजतो. स्कार्लेट आणि तो खूप सारखे आणि एकमेकांना अनुरूप आहेत हे त्याला समजलेले असते. तिला वास्तवाची जाणीव होईपर्यंत वाट पाहण्याचीही त्याची तयारी असते. पण एका दुर्घटनेनंतर त्याचा पेशन्स संपतो, आणि तो निघून जातो.

Inspite of everything, स्कार्लेट स्वतःच्या धारणांशी इतकी प्रामाणिक असते, आणि त्याची प्रचंड किंमत पदोपदी मोजते की  तिचा चाकोरीबाह्य असण्याची आपल्यालाही भुरळ पडते ... ती शेवटी tomorrow is another day म्हणते तेव्हा आपल्या मनात शुभेच्छा उमटतात आणि खात्री वाटायला लागते की ती यातूनही मार्ग काढेल आणि ऱ्हेटला परत आणेल... 

रंजिश ही सही

#रंजिश ही सही...

 कुठल्याही नात्याचा डाव दोघे मिळून मांडतात, ... त्या क्षणी दोघे एका प्रतलावर एका रेषेत असतात.
नंतर मात्र दोघे एकाच दिशेला जातील असे नाही; आपल्या सवंगड्याचे न जाणवलेले कांगोरे टोकदार भासू लागतात, दुसरा एखादा डाव खुणावू लागतो, कधी या सगळ्या खेळाचाच कंटाळा येऊ लागतो...
आणि मग एकजण मनाने आणि पाठोपाठ शरीरानेही यातून बाहेर पडतो. दुसरा सवंगडी मात्र अजूनही या डावात आकंठ बुडालेला...
पण याने कितीही एकतर्फी धडपड केली तरी ती व्यर्थ ठरते; डाव मोडतो, सोबतीचा दिवस मावळतो.
यानंतर सुरू होते ती आशेचे दीप लावून गेलेला दिवस परत आणण्याची वृथा कसरत...
कधी प्रेमाचे, कधी जगाचे दाखले दिले जातात, आर्जवे केली जातात.
 पण हळूहळू रात्र वाढत जाते, अंधार गहिरा होत जातो; आस मावळू लागते, वाट पाहण्यातला फोलपणा कळू लागतो .
पण मन एकीकडे इतकं हतबल आणि दुसरीकडे इतकं चिवट, की वस्तुस्थितीचा स्वीकार करून हार मानत असतानाही शेवटी हा आशेचा दीप विझवण्यासाठी तरी ये, अशी शेवटची साद घालतंच...













दुःखाची शहाणीव

अभिनेता इरफान खानचे त्याच्या आजारपणाविषयीचे पत्र वाचले आणि परत एकदा जाणवले, 'Life is what happens to you when you are busy making other plans.'
त्याने आयुष्याची अनिश्चितता आणि वेदना यावर  सुरेख लिहीले आहे.
आयुष्यात आपण पळत असतो, कितीतरी स्वप्न, इच्छा उराशी कवटाळून , आणि कधीतरी अचानक अनपेक्षितपणे तो क्षण येतो, जिथे तुमच्या हातात काहीच नसतं... You are absolutely helpless. फक्त मृत्यूच असं नाही, पण इतर स्वरूपातही dead ends येतात. फरक इतकाच की ते मृत्यूइतके 100% अपरिवर्तनीय नसतात.
त्याने वेदनेबद्दलही अगदी तंतोतंत लिहिले आहे; तीव्र वेदना पूर्णपणे वेढून टाकते, अक्षरशः गिळंकृत करते.
पण तो अत्यंतिक वेदनेचा, दुःखाचा क्षण साक्षात्कारी असतो. तो अनुभवला, की वैयक्तीक लागेबांधे सुटून आपण आपल्या भूमिकेतून बाहेर येतो आणि साक्षीभावाने आयुष्याकडे बघतो. तेव्हा जाणवतं, समजतं, की अनिश्चित, अनाकलनीय, क्षणभंगुर असले तरीही आयुष्य प्रचंड अद्भुत आहे, सुंदर आहे, भारावून टाकणारं आहे.
 आयुष्याचे हे विश्वरूप दर्शन झाले, की अत्यंत प्रतिकूलतेतही माणसाची जिजीविषा का टिकून राहते, याचं कारण लक्षात येतं.  अतिशय असह्य परिस्थितीतही जगण्याची उमेद टिकून राहते ती या आयुष्याच्या गारुडामुळे ...
आणि मग स्वतःचा भोवताल उध्वस्त झालेला असतानाही आपल्या मुलाचे भावविश्व करपू नये म्हणून धडपडणारा  Life Is Beautiful मधला Guido नव्याने कळायला लागतो ...

प्रथा, उत्सव कधी हवेसे कधी नकोसे

बऱ्याचशा रूढी, परंपरा आपल्या नकळत आपल्या जगण्याचा भाग झालेल्या असतात, कारण लहानपणापासून आपण त्यात भाग घेत असतो.
वय वाढते तसे आपल्या वैयक्तिक ज्ञानकक्षा, अनुभवविश्व विस्तारत जाते, त्यातून कधी आपल्या धारणा बदलत जातात, कधी आपण एखादी नवीन विचारधारा स्वीकारतो. मग मूळ कुटुंबात असणाऱ्या काही प्रथा आपण बंद करतो, कधी काही नव्याने सुरू करतो. 
हे असे प्रत्येकाच्या बाबतीत होते असे नाही.
कधी पुढची पिढी अजिबात बदलत नाही, कधी अंशतः बदलते, तर कधी अमूलाग्र बदलते. आणि वैयक्तिक पातळीवर बदल घडले तरी सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत हे अजून गुंतागुंतीचे होते.
त्यामुळे आपल्याकडे एकाचवेळी कर्मकांडांच्या निरनिराळ्या टप्प्यांवर उभे असलेले समूह, आणि व्यक्ती दिसतात.
यातल्या ज्या गोष्टी आपल्या समता, स्वातंत्र्य या मूलभूत संकल्पनांच्या दृष्टीने घातक आहेत, त्या आटोक्यात आणण्यात आपल्याला काही प्रमाणात यश आलेलं आहे, आणि त्या दिशेने पाऊले टाकायला हवीत याबद्दल सर्वसाधारण सहमती आहे .

काही प्रथा, उत्सव हे अन्यायकारक नसले तरी  थोडया काळापुरते का होईना सार्वजनिक जीवन विस्कळीत करणारे/ manhours चा अपव्यव करणारे/ प्रदूषण वाढवणारे/ सार्वजनिक स्वच्छता बिघडवणारे/ सुरक्षा यंत्रणेवरचा ताण वाढवणारे आहेत.
पण त्याचवेळी शतकानुशतके सुरू असलेले हे उत्सव सांस्कृतिक वारसा जपणारे, लोकांना एकत्र जोडणारे, सश्रद्ध लोकांच्या हृदयाशी जवळीक साधणारे, त्यांच्या भावविश्वाचा अभिन्न भाग असणारे, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणणारे आहेत.
देश मोठा, समाज बहुरंगी, त्यामुळे अशा उत्सवांची संख्याही भरपूर.
 त्यात परत देवांशी निगडित आणि महापुरुषांशी निगडित असे उपविभाग आणि त्यांच्याशी जोडलेल्या अस्मिता आहेत.
या धार्मिक, सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत आपली पसंती-नापसंती आणि त्याची तीव्रता, ही बऱ्याचदा विसंगत, सिलेक्टिव्ह आणि परस्पर विरोधी असते, आणि त्यावर आपल्या वैयक्तिक श्रद्धांचाही प्रभाव असतो . यातून मग आपला तो बाब्या असा पक्षपाती दृष्टिकोन तयार होतो.

आपले एकजिनसी नसणे, आणि म्हणून आपले सार्वजनिक जीवन आधुनिक जगाच्या विशिष्ट सामायिक नियमांमध्ये बांधता न येणे, हे त्यामुळे अपरिहार्य आहे !

अंत अनंत





अंत म्हणजे काय असतो नेमका?
 माणूस संपतो म्हणजे त्याच्याशी संवाद कायमचा संपतो, भविष्यातल्या सगळ्या शक्यतांसकट. ती वाट कायमची बंद होते.

 जगत असताना आपण आपल्या भोवतालच्या लोकांसोबत संपर्काच्या वाटा आणि त्यांच्या टोकाला एक विसावा तयार करत असतो. एक माणूस संपला की एक वाट बंद होते, एक जग संपते कायमचे; त्या व्यक्तीची सोबत गृहीत धरून भविष्यकाळात रंगवलेले जगही कायमचे नाहीसे होते. आपण वसवलेल्या वस्त्या असं एक एक करत ओसाड होत गेल्या की मृत आठवणींशीवाय काय राहतं मागे?
आणि परत काही रस्ते तर मधेच गोठून जातात, अभेद्य भिंती उभ्या राहतात तिथे... माणसं जिवंत असतात पण नाते संपलेले असते कायमचे, त्यांच्यासोबतचे ते जग संपलेले असते. ही अशी कलेवरे मनाचं स्मशान करतात.
आयुष्यभर केलेली ही गुंतवणूक अशी संपून जाते, सगळं तोट्यात जायला लागतं.... तेव्हा हे दुःख, हे नुकसान, फसवणूक झाल्याची भावना, हातात घट्ट पकडून ठेवलेलं असं निसटून जातं तेव्हा वाटणारी हतबलता, हे सगळे सोसणे  असह्य जीवघेणे होते....

आपण  पौर्वात्यांनी यातून पळवाट म्हणून, मनाला आधार म्हणून मग सगळ्या गोष्टींत तत्व शोधली असावीत. सगळ्या आधिभौतिक जगाला तात्विक अधिष्ठान द्यायला सुरुवात केली, अलौकिकतेचे इमले बांधायला घेतले ...
जे जड अस्तित्व आहे त्याच्या पलीकडे काहीतरी असेल, ज्या निव्वळ शारीरिक गरजा आहेत त्याला काही भावनिक कारणे असतील, जो जन्म आहे त्याला प्रयोजन असेल, जो मृत्यू आहे त्याच्यापल्याड काही असेल,  असं म्हणत सगळ्याला कार्यकारणभाव लावायला लागलो. जे आहे त्याहून जास्त काहीतरी आहे अशी कल्पना करु लागलो...जे संपलं आहे ते कुठल्यातरी रुपात अजून शिल्लक आहे, अशी श्रद्धा विकसित करायला लागलो..
 जे आहे ते नश्वर आहे याचा स्वीकार करणं कठीण, मग पुनर्जन्मात परत भेटण्याची आशा आली, आत्मा अमर असल्याचा दिलासा आला, नियती आली, अकाली संपलेल्या नात्यांच्या कलेवरांमध्ये जन्मजन्मांतरीच्या पवित्र बंधनांचे छद्मप्राण आले,  वास्तवातले जग माया, आणि कल्पनेतले जग सत्य व्हायला लागले; अलौकिक असे एक कल्पनेतले जग निर्माण केले आणि प्रसंगी त्याला खऱ्या जगापेक्षा जास्त महत्वाचे मानले.

 शतकानुशतके पिढ्या दर पिढ्या हे असे वळसे घेत घेत परलौकिक विश्वाचे स्तोत्म वाढत गेले आणि तिकडे नेणारे वाटाडे महत्वाचे झाले. वास्तवाला टाळण्याची सवय लागली, कटू सत्याचे हलाहल पचवण्याची ताकद गेली, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची कुवत गेली.

कदाचित यामुळेच अप्प दीपो भव च्या कठीण मार्गापेक्षा बऱ्याचदा जगत मिथ्या ही पळवाट वापरली जाते .


पाश्चात्य जगाने मात्र मध्ययुगानंतर परलोकाकडे लागलेले डोळे परत इहलोककडे वळवले. समाजात बरीच उलथापालथ झाली, आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनातही ...
  त्यांनी हे आयुष्याचे सांत असणे खंबीरपणे, डोळसपणे स्वीकारले, जगताना  सुखासोबत येणाऱ्या दुःखाचीही जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली, शारीर जगण्याला भौतिक अधिष्ठान दिले; त्यांना पळवाटांची गरज उरली नाही...ताब्यात नसलेल्या गोष्टींना काबूत आणायचा प्रयत्न करत ते जीवनाचे साफल्य ऐहिक गोष्टीत मिळवत राहिले. 




भाषा सेतू

वाचायला सुरुवात केली तेव्हा लायब्ररीतल्या ग्रंथपाल मॅडम पुस्तकं सुचवायच्या.
एकदा त्यांनी अनुवादित पुस्तकांचा विभाग दाखवला आणि मग बरेच महिने मी मूळ मराठी पुस्तकं वाचलीच नाहीत, अनुवादित विभागातच रमले .
परवा एकजण फिरत्या वाचनालयासाठी विचारायला आले तेव्हा आधी त्यांना अनुवादित साहित्य ठेवता का याचीच विचारणा केली.
उमा कुलकर्णी नसत्या तर भैरप्पा, अनंतमूर्ती, यांचे शब्दवैभव मला अनोळखीच राहिले असते.
रविंद्र गुर्जर नसते तर मारिओ पुझो, रॉबिन कुक हे लेखक माहीत झाले नसते. नंतर मूळ पुस्तके वाचली तरी सुरुवात अनुवाद वाचण्यापासूनच झाली होती.

डायरी ऑफ ऍन फ्रॅंक, दि अलकेमिस्ट, सिद्धार्थ, इतकंच काय गालिब, फैज, फराज यांची शायरी... अनुवाद नसते तर यातलं काही वाचता आलं नसतं.
आपल्याला माहीत असलेल्या दोन तीन लिपींच्या जोरावर इतर राज्यांतले, इतर देशांतले साहित्य आपण वाचू शकतो; आता प्रचलित नसलेल्या भाषांमध्ये शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झालेली साहित्यसंपदा जाणून घेऊ शकतो;  ते केवळ या माहीत असलेल्या नसलेल्या अनुवादकांच्या जिवावर.
बऱ्याचदा तर अनुवादकांचे नावही आपण विसरून जातो, किंवा बऱ्याच ठिकाणी उल्लेखही नसतो.
आज अंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस आहे ; यानिमित्त भाषेचा अडसर ओलांडून आपलं साहित्यविश्व समृद्ध करणाऱ्या, अनुवाद या लेखनप्रकारात काम करणाऱ्या सर्व लेखकांना मनापासून अभिवादन.


 

 

Friday, 29 November 2019

सर्वदेवसमभाव

शाळेत असताना एक गोष्ट वाचली होती. एक कट्टर विष्णुभक्त असतो; इतका कट्टर की तोंडाने शंकराचे नावही घेत नाही, चुकूनही महादेवच्या मंदिरात जात नाही. विष्णू हाच सर्वश्रेष्ठ देव असे मानत असतो आणि शिवभक्तांचा द्वेष करत असतो.
तिकडे देवलोकात महादेव आणि विष्णूला हे पाहून दुःख होतं. ते ठरवतात की भक्ताला या गोष्टीची जाणीव करून द्यायची की सगळ्या देवांमध्ये एकच तत्व वसते; कुठलाही देव सारखाच, त्यामध्ये भेदभाव करू नये.
मग तो भक्त जेव्हा जेव्हा मंदिरात जातो तेव्हा त्याला मूर्तीच्या ऐवजी शंकराची पिंड दिसायला लागते. तो हादरून जातो, परत परत विष्णूचे स्मरण करू लागतो, पण काही उपयोग होत नाही; डोळे उघडले की पिंडीचे दर्शन! अगदी रडकुंडीला येऊन गयावया करत म्हणतो देवा हे काय पाप माझ्या हातून घडत आहे? तितक्यात विष्णू प्रकट होतात आणि म्हणतात की वत्सा आम्ही सगळे एकच आहोत, तू भेदभाव न करता सगळ्या देवांना सारखंच समज. मग भक्ताला आपली चूक लक्षात येते, आणि सगळे देव सारखे, हे त्याला पटते.

कलियुगात मंदिरांची संख्या खूप वाढली;  देव बिजी होत गेले. मग त्यांनी भक्तांमध्ये सर्वदेवसमभाव जोपासण्याचे कार्य आऊटसोर्स करून प्रगतीशील महाराष्ट्राच्या नेत्यांकडे सुपूर्द केले....

बाला ... का रे भुललासी वरलिया रंगा



#No_compromise_on_looks_vs_क्यों_बदलना_है

जगताना कोरी पाटी घेऊन सुरुवात केलेली असते आपण; पण समाज नावाच्या जंगलात शिरतो, तेव्हा मोठं होतानाच्या प्रक्रियेत कितीतरी ओरखडे उमटतात..., त्यांचे मनात गंड तयार होतात आणि मग किती दिवस, महिने, वर्ष, कधी आयुष्यभर ते आपला पिच्छा पुरवतात. चारचौघांपेक्षा थोडं वेगळं दिसणाऱ्या माणसांसाठी तर to fit in, हा एक  महाकठीण संघर्ष असतो.
 या सगळ्यावर 'बाला' हसत भाष्य करतो.
स्वतःच्या लुक्समुळे अतिआत्मविशास निर्माण झालेला बालमुकुंद केस गळायला लागल्यावर सगळा आत्मविश्वास गमावून बसतो. तो परत मिळवण्याची, स्वतःला स्वीकारण्याची, दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं हे समजण्याची ही गोष्ट.
यातली कानपुरी हिंदी ऐकणं ही एक पर्वणी आहे... कदापि, पीडा, असे शब्द ऐकायला मजा येते. आणि नव्वदीतल्या सिनेमांचे टिकटॉक व्हर्जन्सही फर्मास झालेत.
टक्कलावर वेगवेगळे उपाय योजणाऱ्या बालावर हसताना आपल्यासमोरही अलगद एक आरसा येतो... प्रचलित सामाजिक समजुतींच्या प्रभावाखाली आपण कुणाच्या एखाद्या कमतरतेवर( कमतरता म्हणणं ही चूकच, वेगळेपण खरं तर) कधी हसलेले असतो; कधी कुणी आपल्यावर हसलेले असते.
बाजार सौन्दर्याचे निकष ठरवत असतो; आणि आपण त्यानुसार स्वतःला मोल्ड करण्याचा आटापिटा करत राहतो, पुरेसे मोल्ड झालो नाही तर न्यूनत्व येते, कधी इतर लोक न्यूनगंड देतात.
या सगळ्यात झालेल्या स्वतःच्या  ससेहोलपटीचीही आठवण झाली...  किती वेळ खर्ची पडला, किती वेळा हर्ट झालो, किती गोष्टींमधून निव्वळ संकोचापोटी माघार घेतली, सगळे आजकाल असेच राहतात म्हणून आपणही त्यांच्यासारखं राहण्याची धडपड करताना किती  फरफट झाली...काय काय आठवत राहिलं. त्याचवेळी आपल्यासाठी ज्या व्यक्ती महत्वाच्या आहेत, त्यांनी मात्र आपल्याला किती निःसंकोचपणे स्वीकारलंय हे जाणवून कृतज्ञ वॅट राहिलं. 
त्याचवेळी 'दिखना ही सब कुछ है' चीही एक बाजू समजते. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काही विशेष कौशल्य किंवा हुशारी नसेल, तर अशावेळी सेल्फ-इस्टिम राखण्यासाठी दिसण्याचे भांडवल करणे, ही   मानसिकता बनू शकते, हे जाणवतं.
 एक होतं मात्र; स्वतःला स्वीकारत बाला जेव्हा शेवटी 'क्यों बदलना है' म्हणतो, तेव्हा आपणही हा प्रश्न स्वतःला विचारतो आणि स्वतःविषयीचे अनावश्यक गंड बऱ्यापैकी सोडून देतो...!




ऋणानुबंधाच्या....

कोलाहल फार वाढला की तडक शेताकडे निघावं माणसानं! वाट तीही सुकर नाहीच, चिखल आहे काटेही आहेत, पण शेवटी शेतच ते, गार्डन थोडीच आहे!
एकदा पोहोचलं, की मग मात्र जीव गार होतो अगदी. ही माती सोडली तर बाकी सगळं मातीमोल वाटू लागतं...
तर शेतात गेले अन सोबत आणलेली आंब्याची आणि नारळाची रोपं ओळीत बांधावर लावली... आता असंच हळूहळू वावराच्या शेवटापर्यंत ओळीनं झाडं लावणार आहे. दुसरं कशाचं नाही, पण यापैकी एक झाडाच्या कुशीत आपल्या चिरविश्रांतीची तजवीज करण्याबद्दलचं विल करून ठेवणारंय. कमाल सुकून असणारंय इथं...
या रोपांचीही गंमत आहे. पुण्यातलं एक जोडपं  हापूस आमरस चापतं आणि त्यातली गृहिणी  कोया कुंडीत टाकून त्यांना जोपासते काय, तिची माझी फेसबुक मैत्री होते काय आणि ती मला ही रोपं देऊ करते काय..; आणि दुसरी ग्रीन फिंगर्ड मैत्रीण कोंब आलेले नारळ मागितल्याबरोबर माझ्यासाठी राखून ठेवते काय! याची फलश्रुती अशी, की पश्चिम पुण्यातली ही बाळं ऐंशी किलोमीटर दूर असलेल्या आमच्या शेतात आता रुजतील😊.
माणसांचे बंध तरी काय वेगळे असतात...
काल एका फेसबुकमित्राची पोस्ट होती, फेसबुक लिस्ट मधल्या सगळ्यांना फ्रेंड म्हणणं फारसं संयुक्तिक नाही, ओळख असली म्हणजे मित्र असतो असं नाही. मलाही पटलं, ओळख सुद्धा कधीकधी पूर्ण नसते असंही म्हणाले मी.
आज मात्र तिथं शांत बसताना जाणवलं, हे तर प्रत्यक्षातही घडतं. फक्त ओळख असते मैत्री नाही, फारशी ओळखही नसते मैत्री दूरच, कधी मैत्री होते पण पूर्ण ओळख पटलेलीच नसते. हे सगळे कॉम्बिनेशन्स दोन्ही जगांमध्ये असतात. 'कभी तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकाल आये जनमों के नाते', असं दोन्हीकडे होतं.
हे जगच एक मायाजाल म्हणतात, त्यातलीच ही मयसभा !
  शक्यतांचा सिद्धांत ग्राह्य धरला तर मयसभेतही चुकत धडपडत अधूनमधून तरी बरोबर पाऊल पडतच असणार😊...
एरवीही गावी आलं की सहसा शेताची फेरी चुकत नाही; पण यापुढे या खास जिवलग मैतरांना भेटण्याच्या ओढीनं फेऱ्या वाढतील ..!



Thursday, 7 November 2019

दिवाळसण

गावाकडची दिवाळी म्हटलं की थंडी, धुराचा वास, मिणमिणत्या प्रकाशात लावलेलं तेल उटणं, आणि तळणाचा वास आठवतो.
आता आमच्या घरातली दिवाळी बरीच सुटसुटीत आणि आटोपशीर झालीय, पण अगदी दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही गावी जायचो दिवाळीसाठी.

गावी दिवाळी एकादशीपासून सुरू व्हायची.
कुंभारीण पणत्या घेऊन यायची आणि त्या पुजून घरात घेतल्या जायच्या. पणत्या साध्या पण मोठ्या आकाराच्या असायच्या; रात्री पेटवून पुढच्या मागच्या दारांवरच्या कोनाड्यात ठेवल्या, की पहाटेपर्यंत तेवायच्या.
त्या दिवशीपासून पुढच्या मागच्या अंगणात सडा आणि रांगोळी सुरू व्हायची, ती भाऊबीजेपर्यंत; हौशी लेकी-सुना असणाऱ्या घरात संध्याकाळी परत सडा टाकून वेगळी रांगोळी काढली जायची. आकाशकंदील सहसा चांदणीचाच असायचा, तो पुढच्या ओट्यावर लावला जायचा.
एकादशीला फराळ बनवायला सुरुवात व्हायची. फक्त बुंदी पाडून द्यायला आचारी यायचा; लाडू वळणं, आणि इतर पदार्थ घरीच केले जायचे. लग्नकार्यात वापरतात तशा मोठ्या कढया, पातेली आणि डाव असायचे. सगळा हिशोब शेरांत असायचा.
 लाडू, चिवडा, शेव, करंज्या आणि शंकरपाळे हे मुख्य पदार्थ. चकल्या, अनारसे हे पदार्थ मात्र काहीजणीच करायच्या.
वसू बारशीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि खीर करून गाई वासराला नैवेद्य दाखवला जायचा. घरी गाय नसेल तर शेजारच्या गाईवासराची पूजा व्हायची.
धन त्रयोदशीची पूजा संध्याकाळी असायची.
ती दिवाणखान्यात न करता शक्यतो आतल्या तिजोरीच्या खोलीत केली जायची. पूजेत पैसे, दागिने ठेवलेले असायचे. पूजा करताना  दागिन्यांना आणि दागिन्यांच्या डब्यांना अत्तर लावले जायचे; बरेच दिवस मग दागिने सुगंधी होऊन जायचे! धने-गुळाचा नैवेद्य असायचा.
मग नरकचतुर्दशी उजाडायची. भल्या पहाटे  बंब, चुली पेटायच्या; आणि ज्येष्ठ मंडळी बाकीच्यांना उठवायला सुरुवात करायची. अंगणात किंवा फार थंडी असेल तर माजघरात पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढली जायची आणि साखरझोपेतले एक एक सदस्य उठवून आणले जायचे. बऱ्याचदा लाईट नसायची, मग चिमणी किंवा कंदिलाच्या उजेडात तेलात उटणं कालवून ते अंगाला लावण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग पहाटेच्या थंडीत कढत पाण्याने अभ्यंगस्नान झाले की न्हाणीघरातून बाहेर येताना कणकेचे दिवे मुटके ओवाळून उतरवून टाकले जायचे. हे चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे चार दिवस चालायचे.
 आंघोळीनंतर फराळ व्हायचा. फटाके कुणी फोडायचं नाही .
मग लक्ष्मीपूजन हा मुख्य सण. सकाळी उटणं अंघोळ कार्यक्रम असायचा. मग दुपारी एखादा ताजा फराळाचा पदार्थ नैवेद्यासाठी केला जायचा. संध्याकाळी लक्ष्मीपूजन. ही पूजा गादीवर मांडतात. कदाचित आधी दुकानातली गादी असेल; आता  दुकानं नाहीत सगळ्यांची पण गादीवर पूजा कायम आहे.
पूजा उरकत यायची तेव्हा गोंधळी यायचे आणि संबळ आणि टाळ वाजवून देवीची आरती म्हणायचे. मग पुरुष मंडळींना कुंकू लावून दक्षिणा घेऊन जायचे. पूजेनंतर मुलं लाह्या बत्तासे वाटायला घरोघरी जायची. फटाके फार कमी वाजवले जायचे.
पाडव्यादिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आणि फराळाच्या ताटांची देवाण घेवाण असायची. गडी माणसांना थोडा जास्त फराळ बांधून दिला जायचा. फराळ मागायला बरीच लोकं मागच्या दारी यायची. त्यांना पसाभर चिवडा आणि दोन लाडू वाढले जायचे; क्वचित शेव.
दिवसभर  कुणी कुणी भेटायला, दिवाळीचं पाया पडायला यायचं.  लहान मुलं नवीन कपडे घालून फराळाची ताटं घेऊन यायची.
दुपारनंतर पाडवा संपता संपता दिवाळीचा उत्साहही मावळायला लागायचा.
 पण सासुरवाशीणींच्या चेहऱ्यावर मात्र चोरपावलांनी हसू उमलायला लागायचं. डोळे चमकायला लागायचे, आवाज थोडा चढायचा, पिशव्या सावरणं सुरू व्हायचं.
भाऊबीजेला भाऊ यायचे ना सगळ्यांचे...  भाऊबीजेच्या दिवशी पाहुण्याची ओवाळणी, जेवण व्हायचं, फराळाचे डबे दिले घेतले जायचे. मग भाऊराया पोक्त आवाजात घरच्या कर्त्या पुरुषाची परवानगी मागायचा... ताईला अन पोरांना नेतो चार दिवस, चालंल ना ओ ?
चालंल की, पण लवकर परत आणून सोडा काय, म्हणत परवानगी मिळायची.
विजेच्या वेगाने बॅगा बाहेर पडवीत यायच्या. तिची एक नजर तरी वळेल आपल्याकडे म्हणून लक्ष ठेवून असलेले धनी बऱ्याचदा हिरमुसले व्हायचे... आता 'ति'चे चित्त माहेरी लागलेले असायचे, दुसरं काही दिसणं सुचणं बंद झालेलं असायचं...
मग गाडीत बसता बसता डोक्यावरचा पदर हळूच खांद्यावर नि:श्वास घ्यायचा, पोरं मामाशी गप्पा टाकण्यात गुंग व्हायची, आणि तिचे थकलेले खांदे सैलावायचे, डोळे मिटायला लागायचे, आणि मन अलगद माहेरच्या कुशीत पोहोचलेले असायचे ...
इकडं एकादशीपासून लगबग सुरू असलेलं घर मात्र एकदम शांत शांत होऊन जायचं. डौलात लहरत असलेली आकाशदिव्याची चांदणीही मलूल, निपचित होऊन जायची...