उन्हाळा म्हणजे लग्नांचा ऑफिशियल मौसम. उन्हाळी सुट्टीची सोय बघून बहुतेक लग्नं उन्हाळ्यात होतात. साधारणपणे मे हा सर्वाधिक पॉप्युलर महिना; इकडे सूर्यनारायण फॉर्मात आणि तिकडे लग्नं जोमात!
आता अशात उन्हाळ्याच्या त्रासाला घाबरून तुळशीचं लग्न झाल्यावर ख्रिसमसच्या सुट्ट्या पाहून हिवाळ्यात लग्न होत आहेत; पण ते म्हणजे आजकाल कुठल्याही महिन्यात कैऱ्या मिळतात तसंय; खरं लोणचं ते उन्हाळ्यातलंच, तसं खरी लग्नाची मजा उन्हाळ्यातच!
नवरीचा शालू, नवरदेवाचा सूट, स्टेजवरचा 'वारं कमी, आवाज जास्त', वाला मोठा स्टँडवाला फ्यान, पिटुकले रुमाल घेऊन नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरचा घाम नजाकतीने पुसणाऱ्या करवल्या, दोन स्ट्रॉ टाकलेली एक थम्सपची बाटली, घाम पुसत जेवणावर ताव मारणारे वऱ्हाडी, कितीही केला तरी कमीच पडणारा आणि शेवटीशेवटी पाणी टाकून वाढवलेला मठ्ठा... हे खरे लग्न!
अशा या लग्नाचा पहिला पडाव म्हणजे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम... साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये "पोरगी पाहायला जायचंय" हा सगळ्यात महत्वाचा इव्हेंट सुरू होतो; तो मग एप्रिलमध्ये आणि काही अगदीच उशिरा उजाडलेल्यांसाठी मेमध्येही सुरू राहतो.
गावाकडे लग्न ठरवताना पहिला टप्पा म्हणजे मुलगी दाखवणे, त्यात पसंती झाली की मुलीकडचे लोक मुलाचं घर पाहायला येतात. त्यांना घरदार पटलं, की ते मुलाकडच्यांना बैठकीचे आमंत्रण देतात.
मग बैठक नावाचा वर्ल्डफेमस कार्यक्रम होतो.
पण ते नंतर, आधी मुलगी बघणे हा कार्यक्रम ...😊
काहीजणांना, किंबहुना बऱ्याच जणांना ही पद्धत मुलींसाठी अपमानकारक, अन्याय्य वाटू शकते. समज आल्यावर मलाही वाटायला लागली, पण बरीच वर्षे गावाकडे अवतीभोवती हेच वास्तव होतं, अजूनही काही प्रमाणात आहे. जे बरीच वर्षे बघत आले, ज्या घडामोडींनी हे एक दोन महिने व्यापलेले असतात, ते सहज मजेत मांडलं आहे... कृहघे 😊.
तर गावात काही ज्येष्ठ, काही मध्यमवयीन मंडळी लग्न जमवणे या कामात निष्णात असतात. कुणाला आपल्या मुलाचं/ मुलीचं/ भाच्याचं /पुतणीचं लग्न करायचं असलं की या मंडळींना आधी सगळा बायोडाटा दिला जातो. त्यांच्या डोक्यात सगळा डेटा फिट असतो. ते दोन चार अनुरूप स्थळं सुचवतात. मुलगी असेल तर तयारी किती? आणि मुलगा असेल तर अपेक्षा किती? हे सगळ्यात कळीचे प्रश्न. याचं उत्तर नीट खरंखुरं द्यायचं असतं. कारण पुढच्या सगळ्या वाटाघाटी त्यानुसार होणार असतात.
मुलीच्या घरच्या कर्त्या पुरुषाला मग हे मध्यस्थ भेटतात; किती भारी स्थळ आलंय हे सांगतात. मग बघण्याचा कार्यक्रम ठरतो.
मुलाकडे मग लगबग सुरू होते.
मुलगी बघायला कोण जाणार याची यादी ठरते. मानपानानुसार मोठे चुलते-चुलती, मामा-मामी या मेम्बरना प्राधान्य असतं. मुलाची लग्न झालेली बहीण असेल तर ती आणि जावाईबापू यांचाही मान ठेवायला लागतो. यातल्या कुणाचं तरी एक लहान मूलही बाय डिफॉल्ट सोबत असतं. मध्यस्थ तर असतातच. या सगळ्यात मेम्बर जास्त व्हायला लागले तर बऱ्याचदा मुलाच्या आईचाच नंबर कट होतो.
मुलगी बरी वाटली तर पाहण्याच्या सेकंड राऊंडसाठी काही अनुभवी महिला सदस्य राखीव ठेवले जातात.
या कार्यक्रमाला सार्वजनिक वाहनातून जायचं नसतं; घरात गाडी नसेल तर भाड्याची गाडी ठरवली जाते (आमच्याकडे गाडी बांधणे म्हणतात). मग ही सगळी वरात मुलीकडच्यांकडे निघते.
बायांनी शक्य तितके दागिने आणि अगदी रेशमी नाही पण बऱ्यापैकी भारी साड्या नेसलेल्या असतात ( यावरून "माझ्याकडं एकही चांगली नवी साडी नाही, कधी म्हणून तुम्ही काही घेऊन देत नाही. कितीवेळा हे एकच लुगडं गुंडाळायचं, नशीबच दरिद्री माझं😢" असा एखादा सुखसंवाद मामा- मामी, काका-काकू यांच्यात घडलेला असतो!).
दिलेल्या वेळेत पोहोचणं फाऊल असतं; साधारण एखादा तास उशिरा मंडळी पोहोचतात. आधी तर पहिल्या राउंडला मुलगा नसायचाच, पण आता मुलीकडचेही थोडे पर्टीक्युलर झालेत, त्यामुळं बऱ्याचदा मुलगा सोबत असतो.
इकडं मुलीच्या घरी सकाळपासून नुसती गडबड सुरू असते. बाहेरगावचे पाहुणे असतील आणि दुपारची वेळ असेल तर सहसा पूर्ण स्वयंपाक केला जातो; भर दुपारी पोहे कोण खाणार हा हिशोब. आणि पोहे केले तर त्यांना इकडे नुसते पोहे म्हणतात, कांदेपोहे कुणी म्हणत नाही. पोह्यांसोबत मग सहसा शिरा असतो.
घराचा दिवाणखाना मस्तपैकी आवरला जातो. सतरंजी, खुर्च्या लोड-तक्के मांडले जातात. मोठी सतरंजी गल्लीत काहीजणांकडेच असते, ती सकाळीच आणून ठेवली जाते. पाहुणे जास्त संख्येत येणार असतील आणि घरात नसतील तर शेजारी-पाजारी विचारून ज्यादा खुर्च्या, चमचे, प्लेट सगळं जमवलं जातं. अशावेळी सगळं पटापट पुरवलंही जातं.
मुलीचं तयार होणं हा एक स्वतंत्र अध्याय असतो. ती एकाच वेळी घाबरलेली आणि चिडलेली असते आणि तिला आईची कुठलीच साडी आवडत नसते. नुकतंच लग्न होऊन आलेल्या कुठल्यातरी वहिनीची थोडी लेटेस्ट फॅशनची साडी मग आणली जाते. त्याच वहिनीकडे मग तिचं मेकप डिपार्टमेंट सोपवलं जातं. "होटं रंगवू नका गं, बरं नाय दिसत", या सूचनेसकट !
दुसरीकडे जो मेनू ठरलाय तो बनवण्यासाठी सदस्य नेमले जातात. धाकटी काकू, मामी, वहिनी, एखादी सुगरण शेजारीण असे कुणीतरी ही जबाबदारी खांद्यावर घेतं.
मुलीची आई सहसा सगळं कोऑरडीनेट करत असते. आणि मुलगी स्वतः कधीही ते पोहे बनवत नसते; बहुतेक वेळा सर्व्हही करत नसते. ती नेमलेल्या खुर्चीवर किंवा पाटावर डोक्यावर/ खांद्यावर पदर घेऊन नुसती येऊन बसते.
तर अशी सगळी तयारी झाली, की वाट बघणे सुरू होते. मुलीकडची मानाची मंडळीही एव्हाना यायला लागतात. आधी
"पाहुणे घरून केव्हा निघालेत" याची खातरजमा करायला लँडलाईन फोन वापरले जायचे. आता मोबाईलमुळे क्षणा क्षणाला रिपोर्ट मिळत राहतो.
एकदाची गाडी दारात येते, आणि मग पाहुण्यांना हातपाय धुवायला पाणी, टॉवेल द्यायची लगबग सुरू होते.
इकडे मुलीला शेवटचे मेकप टच( म्हणजे परत एकदा थोडी पावडर लावणे, पदराची पिन काढून परत लावणे इ,) देणे सुरू होते.
स्वयंपाकघरात सगळी तयारी करून ठेवलेले पोहे फोडणीला टाकले जातात.
हाश- हुश्श करत एकदाचे सगळे पाहुणे त्या सजवलेल्या दिवाणखान्यात विराजमान होतात, आणि मग सोहळ्याला सुरुवात होते...
(क्रमशः😊)