गाणी सुरू असली की स्वयंपाकघरातला वेळ फार छान जातो. मघाशी फरीदा खानुम आर्जवी स्वरात "कल की किसको खबर जानेजा, रोक लो आज की रात को", म्हणत होत्या. आणि एक गमतीशीर विचार मनात चमकला; खरंच उद्या जगाचा अंत होणार असेल तर आजची रात्र शेवटची!
लगोलग "रात की बात है, और जिंदगी बाकी तो नहीं " असं व्याकुळ होऊन म्हणणारा संजीवकुमार आठवला, " शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो" म्हणणारी साधना आठवली... आणि " वही राज-ए- दिल कहने की रात आयी" म्हणणारे रफीसाबही आठवले.
हाताशी काही तासच आहेत म्हटल्यावर खरोखर काय करायला हवं? तसंही इतक्या कमी वेळात काय करू शकतो, काय बदलू शकतो !
जे जगत आलो त्याबद्दल विचार केला तर कुठले पारडे जड होईल; कृतार्थतेचे की रिग्रेट्सचे?
काय काय राहून गेलं... साधं बोलणं सांगणं सुद्धा; कधी मन तर कधी मान राखायचा म्हणून, कधी भीड म्हणून, कधी ही वेळ योग्य नाही म्हणून अव्यक्त राहिलेले किती काय असेल. काही छोट्या मोठ्या इच्छा असतील; नंतर बघू म्हणत एक बकेट लिस्ट बनवून त्यात भरून ठेवल्या असतील. काही शिखरं असतील, साद घालणारी पण सर न झालेली...
दुसरीकडे जन्माचे सार्थक झाले, असे वाटायला लावणाऱ्या काय अचिवमेंट्स असतील; वैयक्तिक उत्कर्षाच्या असतील की कौटुंबिक साफल्याच्या? आपल्याला आयुष्याने किती भरभरून दिलं म्हणून डोळ्यात कृतज्ञता दाटून येईल, की life was too unfair असं वाटून दुःखाच्या अश्रूंनी डोळे वाहतील...?
बहुतेक वेळा आयुष्य कालचा कल आणि उद्याच्या कलमध्येच फार वेळ घालवतं.
हे डोक्यात आलं आणि काही दिवसांपूर्वी पाहिलेल्या एका उर्दू मालिकेचं टायटल सॉंग आठवलं. 'जिंदगी गुलज़ार है' नावाची सिरीयल; त्यात एपिसोडच्या शेवटी लागणारं, 'जिंदगी खाक न थी, खाक उडाते गुजरी', हे गाणं अविस्मरणीय आहे. लिरिक्स अतिशय अर्थपूर्ण आहेत आणि संगीत संयोजन आधुनिक धाटणीचे. हादिका कियानी नावाच्या अतिशय प्रसिद्ध पाकिस्तानी गायिकेने हे गीत गायलंय.
गाण्याचा अचूक अनुवाद करता येणं मलाही कठीण आहे; पण ढोबळ अनुवाद केला आहे( काही दुरुस्ती असेल तर स्वागत) . उर्दूतले काही शब्द बहुअर्थी आहेत, उदा.गुजरी म्हणजे व्यतित झाली असा अर्थ होतो आणि सोसणे असाही अर्थ होतो(उदा: हम पे क्या गुजरी क्या बताये). त्यामुळंही अनुवाद करताना चुका होऊ शकतात. तसेही पद्य रचनेचे अर्थ फक्त मूळ कवीच अचूक स्पष्ट करू शकतो; आपण फक्त ढगात आकार शोधतो, आणि आपल्या मनातल्या ऋतूनुसार आपले आकलनही बदलत राहते!
गाभा हा आहे की आयुष्य व्यर्थ नसतं, पण बऱ्याच व्यर्थ गोष्टींमध्ये वाया जातं....
ज़िन्दगी ख़ाक न थी, ख़ाक उड़ाते गुज़री
तुझसे क्या कहते, तेरे पास जो आते गुज़री
दिन जो गुज़रा तो, किसी याद की रौ में गुज़रा
शाम आई तो कोई ख़्वाब दिखाते गुज़री
अच्छे वक़्तों की तमन्ना में रही उम्र-ए-रवां
वक़्त ऐसा था के बस नाज़ उठाते गुज़री
ज़िन्दगी जिसके मुक़द्दर में हों ख़ुशियां तेरी
उसको आता है निभाना सो निभाते गुज़री
ज़िन्दगी नाम उधर है किसी सरशारी का
और उधर दूर से एक आस लगाते गुज़री
रात क्या आई के तन्हाई की सरगोशी में
हू का आलम था, मगर सुनते-सुनाते गुज़री
बारहा चौंक सी जाती है मुसाफ़त दिल की
किसकी आवाज़ थी ये, किसको बुलाते गुज़री....
---- नसीर तुराबी
आयुष्य म्हणजे धूळ नव्हती, पण धूळ उडवण्यात बरंच आयुष्य गेलं,
त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत (ते जवळून कळेपर्यंत) खूप काही सहन करावं लागलं.
चांगला काळ येईल या आशेवर जगताना बरचसं आयुष्य काळाच्या तालावर जुळवून घेण्यातच गेलं.
ज्याच्या नशिबात जीवनाचे आनंद असतात, त्याला ते पेलताही येतात; मग ते उपभोगण्यात त्याचं आयुष्य सुखनैव व्यतीत होत राहतं.
कुठे आयुष्य म्हणजे अखंड धुंदी आहे , तर कुठे एका आकांक्षेच्या पूर्तीच्या प्रतिक्षेत ते संपतंय.
अंतर्मनाचा प्रवास पाहताना परत परत आश्चर्य वाटतं, ही साद नेमकी कुणाची होती आणि ती कुणाला हाक देत होती...
No comments:
Post a Comment