अगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथांचे वैशिष्ट्य म्हणजे कथानकाच्या ओघात माणसांबद्दल, परिस्थितीबद्दल येणारे भाष्य, ज्याने एकदम चमकायला होते.
" It is perhaps the absorption in one's personal life that has lead the human race to survive".
जगात इतकी उलथापालथ होत असताना लोक क्षुल्लक वैयक्तिक गोष्टींमध्ये कसे काय गुंग राहू शकतात असे एक पात्र वैतागून म्हणते तेव्हा हर्क्युल पायरो वरचे वाक्य उच्चारतो. सामान्य लोक आपले सामान्यत्व स्वीकारत अस्थिर परिस्थितीतही आपले दैनंदिन आयुष्य सुरू ठेवतात, आणि त्यातल्या छोट्या सुखा-दुःखांशी समरस होत उत्कटतेने जगत राहतात, त्यामुळं जगरहाटीचे चक्र प्रतिकूल काळातही बऱ्यापैकी सुरळीतपणे सुरू राहते, असा साधारण त्या संवादाचा आशय आहे.
आज फेसबुकवर कुमार गंधर्वांनी गायलेले कबीराचे एक भजन सापडले. आवडती जोडी होतीच, आणि यात राग दुर्गा वापरलेला आहे ही माहितीही मिळाली.
गाणं शिकण्याचा प्रयत्न गाण्याच्या शिशुवर्गातच आटोपता घेतला होता, पण तेव्हा थोडी थोडी शिकलेली एकमेव चीज म्हणजे या दुर्गा रागातले 'सखी मोरी' हे गीत; त्यामुळे या रागाबद्दल विशेष ममत्व...
सगळा योग जुळून आला आणि दिल बाग बाग होण्याची प्रचिती आली; काही तास तरी सगळ्या विवंचना विसरून मन आनंदात न्हाऊन निघालं.
No comments:
Post a Comment