Saturday, 27 February 2021

गणपती उत्सवाचा उगम

 श्रीगिरी कुटुंबात प्रवेश झाला तेव्हा गतवैभवाच्या बऱ्याच गोष्टी आमच्या सासऱ्यांकडून ऐकायला मिळाल्या, पण तेव्हा मौज म्हणून ऐकलं आणि सोडून दिलं होतं. 

त्यांना एक घटना विशेष अभिमानास्पद वाटते आणि  दरवर्षी गणपतीच्या दिवसांत आमच्याकडे याची चर्चा होते. त्यांचे आजोबा चंगळप्पा श्रीगिरी यांच्या घरी गौरी गणपतीच्या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक आले होते आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांना तिथली गर्दी पाहून सुचली होती. 

 श्रीगिरी यांच्याकडे गणपती आणि गौरीचा उत्सव मोठ्या थाटामाटात व्हायचा; नेत्रदीपक आरास असायची आणि कलावंतांचा गाण्याचा कार्यक्रमही असायचा. लोक आरास आणि गाण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने यायचे. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने झालेली गर्दी पाहून लोकमान्यांना वाटले की याच धर्तीवर सार्वजनिक उत्सव केला तर लोक एकत्र येतील आणि देशकार्यासाठी याचा वापर करून घेता येईल. त्यातून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले.

पुढच्या पिढीतल्या मुलांना हे सगळे कितपत खरे आहे याबद्दल थोडी शंका वाटायची! आमच्या नणंद बाईंनी मात्र याविषयी सकाळ पेपरमध्ये आलेल्या एका जुन्या लेखाचे कात्रण जपून ठेवले होते. आज त्यांच्याकडून  त्या कात्रणाचे फोटो मिळाले. 

नंतर आमच्या सासऱ्यांच्या वडिलांनी सोलापूर सोडले आणि  ते सासरवाडीच्या गावी येऊन स्थायिक झाले; कारण सासूबाई एकुलते अपत्य होत्या.

श्रीगिऱ्यांकडे आता गणेशोत्सव साधा असतो. गावाकडे वेगळा गणपती बसवतात तो अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. इकडे आमचा मात्र दीड दिवसांचाच असतो. यंदा धातूच्याच गणपतीची पूजा केली आहे.

पिढ्यांगणिक बदल होत असतात, तसे उत्सवांचे रूपही बदलत जाते... हर घडी जिंदगी रूप बदलते,  तसे हर पिढी संस्कृती रंग बदलते...



No comments:

Post a Comment