Friday, 26 February 2021

कोरोना ३

 प्रश्नच प्रश्नं आणि उत्तरं भविष्याच्या काळोखात दडलेली... अजिबात दृष्टीक्षेपातही नाहीत. 

आपल्या किंवा आपल्या मागच्या पिढीनेही असे देशव्यापी संकट पाहिले नसेल. आपला देश कुठल्या विश्वयुद्धात थेट सहभागी नव्हता. स्वातंत्र्यलढा आपण अनुभवला, पण त्यात पुढे एक पॉजिटीव्ह ध्येय होते आणि त्याकडे पाहून लढण्याची जिद्द होती. स्वातंत्र्याचे नेमके इम्प्लिकेशन्स सगळ्यांना माहीत नसतील, पण असंख्य लोकांची त्या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्यांवर श्रद्धा होती..


दुसऱ्या महायुद्धाच्या कठीण काळात इंग्लंडमधल्या लोकांची काय मनःस्थिती असेल? अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मनोधैर्य टिकवण्यासाठीच्या काय प्रेरणा असतील? जेव्हा समूहावर मोठे संकट येते तेव्हा कुठल्या घटकाचे महत्व सगळ्यात जास्त राहत असेल... स्वयंशिस्त, ज्ञान, आज्ञा पाळण्याची वृत्ती, ऐक्याची भावना, बंधुभाव, श्रद्धा ... ? 

आपले एकजिनसी नसणे हा या लढाईतला अडसर ठरेल का? एक धर्म पाळणारे समूह, एकेश्वरी धर्म पाळणारे समूह यांच्यात बंधुतेची भावना जास्त असते का? अशा आपत्तीना तोंड देताना या घटकाचा मतैक्य होण्यासाठी काही उपयोग होतो का?

अजूनही पक्षीय अभिनिवेषाच्या परिघात विचार करणारे आणि बेजबाबदारपणे आचरण करणारे; असे लोक एकदिलाने, दृढनिश्चयाने, जबाबदारीने वर्तन करत या लढ्याला सज्ज होतील? 

की सगळे एकमेकांची अक्कल काढण्यात आणि शेखचिल्ली बनण्यात धन्यता मानतील... 

एपिडेमिक किती मोठा असणार, हे फक्त आरोग्य यंत्रणा आणि सुविधांवर नाही, तर या गोष्टींवरही अवलंबून असणार आहे...

No comments:

Post a Comment